'to err is human ' हि खूपच प्रचलित अशी इंग्रजी म्हण आहे. त्यानुसार माणूस हा चुका करणारा प्राणी आहे हे समजते. त्या चुका जर सुधारता आल्या तर त्याला प्रगतीपथावर नेतात, आणि वाढवल्या तर त्याला विनाशा कडे नेतात. हे काही माणसाला आज उमगलेले सत्य नाही, तर पिढ्यानपिढ्या घडत आलेली गोष्ट आहे. तरीही आपल्या आजूबाजूला माणसे चुका करीतच असतात, आणि हि मालिका अव्याहतपणे चालूच राहते.
आज जी गोष्ट मी सांगणारे ती अशीच एका वाट चुकलेल्या माणसाची आहे.
तर हा आपला चारचौघांसारखा नाकासमोरून चालणारा उदय. भरलेल्या घरात, ऐश्वर्यात आणि लाडात वाढलेला असा उदय. धाकटे अपत्य आई-वडिलांच्या विशेष मर्जीतील असते असे म्हणतात, त्यात आपला उदय तर जुळ्या तील वाचलेला म्हणून अजूनच खास. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणेच आई-वडील आणि मोठा भाऊ या सर्वांपेक्षा जरा निराळ्या, शांत स्वभावाचा, काहीसा अबोल पण कळी खुलल्यावर मस्त कोट्या करून सर्वांना हसवणारा असा उदय.
अबोल स्वभावाचा असूनही त्यामानाने उदय ने बर्यापैकी मित्रं अवतीभवती जमवलेले. कोमर्स घेऊन सी ए करायचा त्याचा मानस होता. आर्टिकलशिप च्या वर्षान मध्ये असताना त्याचे वर्तुळ आपसूक वाढत गेले. त्या वर्तुळात चक्क एका मुलीचा, तीही गुजराथी मुलीचा समावेश झाला. ती दोघं वरचेवर एकत्र हिंडू-फिरू लागली आणि थोड्याच अवधीत त्यांची मैत्री बर्यापैकी घनिष्ठ झाली. या गोष्टींनी घरच्या- दारच्या लोकांच्या भुवया ना उंचावत तरच नवल. उदय च्या आईने तसे विचारल्यावर त्याने सर्व हसण्यावारी नेले. पण आपल्या मुलातील हा बदल तिला जाणवल्याशिवाय राहिला नाही.
उदय ची वाहिनी जवळपास त्याच्याच वयाची.तिची आणि ह्या गुजराती मैत्रिणीची पटकन मैत्री जमली. तशी होतीच उर्मिला. गुजराथी असूनही मोडके-तोडके मराठी सुद्धा बोलत असे. कुणीही पटकन ओळख करून घ्यावा असा हसरा आणि बोलका होता तिचा चेहरा. डोळे मिचमिचे, हनुवटी निमुळती, चुणचुणीत आणि स्मार्ट अशी उर्मिला उदय च्या वाहिनीलाही आवडली. उदय,उर्मिला,वाहिनी आणि वहिनीची एक जिवलग मैत्रीण अशी चौकडी वारंवार एकत्र मिळून सिनेमा आणि हॉटेलिंग करत असत. एव्हाना दोघांचे गुपित वाहिनीला कळले होते. तिने त्यावरून उर्मिलाला छेडले हि होते. वाहिनी सारखी विचारायची तिला," बाई ग, घरून काय सांगून येतेस तू इथे? माहित्येय का त्यांना आमच्या उदय बद्दल? एकदा त्यालाही घरी बोलाव तुझ्या." त्यावर उर्मिला कानावर हात ठेऊन म्हणे," काही तरी काय वाहिनी, माझ्या घरचे खूपच कर्मठ आहेत. घरी बिरी नेला ना उदय ला तर माझे CA वगैरे सगळं बंद पडेल."
वाहिनीने त्यावेळी इतके मनावर घेतले नाही. तिला वाटले , जाऊदे , पोर इतकी मायाळू आहे आणि लाघवी आहे, इतकी आपल्यात मिळून मिसळून वागते, मोठ्या पासून लहानांपर्यंत सगळ्यांशी वागायची रीत माहिती आहे, अजून काय हवं? मग यथावकाश उदय आणि उर्मिला ची आर्टिकल-शिप संपली. दोघांना हि त्याच फार्म मध्ये ट्रेनी म्हणून सामावून घेतले आणि एकीकडे त्यांचे CA चे atempts देणे चालू होते. आता अभ्यास निमित्त उर्मिला वरचेवर उदय च्या घरीच पडीक राहू लागली. दोघेही उदय च्या खोलीत तासंतास बसून असत. इथवर सगळं ठीक होतं. पण हळू हळू जेव्हा त्यांनी खोलीचे दार बंद करायला सुरवात केली, तेव्हा वाहिनीला ते खटकायला लागले. तिने अनेक वेळा हि गोष्ट आपल्या सासूला म्हणजे उदयच्या आईला सांगून पहिली. पण कोणीच फारसे मनावर घेतले नाही. उदय चे बाबाही एरवी एवढे कडक पण ते हि सर्व कसे काय खपवून घेत ते वाहिनीला समजत नसे.
पुढे-पुढे घरातल्या सर्व सण-समारंभ, कार्यक्रमांना आणि पाहुण्यांसमोर देखील उदय ची खास मैत्रीण अशीच उर्मिला ची ओळख होऊ लागली. अगदी वाहिनीच्या माहेरच्या गोतावळ्यात हि तिची उपस्थिती लोकांना दिसू लागली.
पण एकदाही पट्ठी ने आपल्या घरी, किंवा समाजात किंवा आपल्या वस्तीच्या आसपास देखील उदय ला फिरकू दिले नव्हते. ते दोघे ऑफिस कलीग्स आहेत एवढेच तिच्या घरी माहित होते. हे सर्व आता वाहिनीला उदयच्या काळजीपोटी चांगलेच खटकायला लागले. उदय चा दादा हि आपल्या आईला ह्या सर्वाचा एकदाचा सोक्ष मोक्ष करायचा लकडा लावू लागला. मग उदय च्या आईने उर्मिला ला निक्षून सांगितले कि बाई आता काय तो एकदाचा निर्णय घे आणि तुझ्या घरच्यांचा कल बघ. नाहीतर फार पुढे जाण्यात काही अर्थ नाही.
प्रकरण गळ्याशी आल्यावर तिचा नाईलाज झाला आणि तिला घरी सांगावच लागलं. तिच्या अपेक्षेनुसार घरी वादळ उठलं. तिच्या आई-बाबांना समाजा बाहेरचा मुलगा मान्यच नव्हता. मग तिची आई आणि मावशी एकदा उदय च्या आई-बाबांना भेटायला आले, ते हि ना सांगता, अचानक.
त्या दिवशी वाहिनीचे डोहाळेजेवण दणक्यात साजरे झाले होते. मंडळी नुकतीच दुपारी आडवी झाली होती. आणि दारात उर्मिला ला घेऊन तिची मावशी आणि आई हजर. सुरवातीलाच त्यांनी सांगितले कि हे प्रकरण इथेच थांबवावे लागेल, कारण उर्मिला चे बाबा कधीच तयार व्हायचे नाहीत. मग उदय च्या दादाने त्यांना सुनावले कि इतका विरोध आहे हे माहित होतं ना उर्मिला ला, तर मग एवढी पुढे गेलीच कशी तुमची मुलगी? मग परस्पर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि शेवटी या प्रकरणावर एकदाचा पडदा पडला.
झाले त्यात नवल नव्हते. उदय ला एका चाणाक्ष मुलीकडून व्यवस्थित वापरले गेले होते. उर्मिला च्या लोभस मुखवट्या आड एक मतलबी, खुशालचेंडू आणि स्वार्थी चेहरा दडला होता. ३-४ वर्ष एका चांगल्या सधन, सुशिक्षित घरातील अत्यंत सालस आणि निरुपद्रवी मुलाला, जमतंय तोवर खेळवून शेवटी आपली प्रतिमा आपल्या समाजात स्वच्छ ठेवण्यात उर्मिला यशस्वी झाली होती. उदय च्या आई-बाबा ना हे छक्के- पंजे कुठे समजणार. पण त्यांनी सुद्धा जर वेळीच उदय ला लगाम घातला असता, तर उर्मिला ने एवढी मजल मारलीच नसती. पण आपल्या समाजात चरित्र बघतात ते मुलीचेच. मुलगा कुठेही शेण खावो, तो परत उजळ माथ्यानेच मिरवतो. हाच कित्ता उदयच्या बाबांनी गिरवला आणि एका शब्दाने आपल्या मुलाला जाब विचारला नाही. उलट हा विषयच आता घरातून बाद झाला.
उदय ने ट्रेनी जॉब सोडला आणि taxation चा पुढचा एक कोर्स केला. मध्ये मध्ये CA चे attempts देणे चालूच होता. पण त्यात म्हणावे तेवढे यश त्याला मिळत नव्हते. अशात दोन वर्ष सरली. आणि आता उदय चे आई-बाबा त्याच्या लग्नाचं बघायच्या मागे लागले. आधी उदय ने लक्ष दिले नाही, आत्ता नको मग बघू, करत टाळत राहिला. पण आईने हळू हळू त्याला तयार केलेच. मग शेवटी हो-नाही करत उदय ने एका वधू-वर सूचक संकेत स्थळावर नाव नोंदवले.
संकेत स्थळावरील नवी पद्धत उदय ला भलतीच रुचली. त्यामधूनच एका मुलीचे प्रोफाईल त्याच्या पाहण्यात आले. तिने त्याला आणि त्याने तिला सिलेक्ट केले. आणि च्याट वर दोघे एकमेकांशी बोलू लागले. पोरगा आयुष्याकडे नव्याने बघू लागलाय ह्याचे समाधान आई बाबांना वाटू लागले. पण त्यांनी मागल्या अनुभवावरून, पुन्हा उदयच्या हातून काही कामी जास्त होऊ नये ह्यासाठी तरी, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन वेळप्रसंगी त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे ना आणि त्यापासून तो सावधगिरी बाळगतो आहे ना, हे तरी तपासून पाहायला हेवे होते. आपला मुलगा एकदा ठेचकाळून सावरलाय, आताही कदाचित त्याचे फासे उलटे पडू शकतील, आपण जातीने त्याच्या उलाढाली तपासून पाहिल्या पाहिजेत , अशी कुठलीही खबरदारी या हि वेळी उदय च्या आई-बाबांनी घेतली नाही.
आणि एके दिवशी आपण च्याट करीत असलेल्या मुलीचे च स्थळ पहायचे असे उदय ने घरी जाहीर केले. इथवर हि ठीकच होते. पण घरी भेटण्यापूर्वी मुलीने उदय ला आधी परस्पर बाहेर हॉटेल मध्ये भेटायला बोलावले. हे हि काही वावगे नव्हते . पण त्यापूर्वी आपल्या मुलाचे कमकुवत व्यक्तिमत्व डोळ्यापुढे ठेऊन, त्याला जबाबदारीच्या समजुतीच्या ४ गोष्टी सांगून अथवा त्याच्या बरोबर कुणी पारखी नजरेचा सोबती पाठवले असते तर पुढे घडलेले रामायण कदाचित टळले असते.
पण म्हणतात ना.........विनाशकाले विपरीत बुद्धी.....
उदय जसा जोशात मुलीला भेटायला गेला त्याहून दुप्पट जोशात पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेत तो परत आला. आणि आल्यावर आईला म्हणाला," अग, मुलगी म्हणजे वैदेही ओळखीतालीच आहे आपल्या. आपल्या बाबांचे ते डॉक्टर मित्रं नाहीत का लुकतुके, ६० व्या वर्षी गेले ते? त्यांची सख्खी पुतणीच हि. एक मोठी बहिण आहे. ती आणि तिचा नवरा मुले बंगलोर ला असतात. भाऊ हिच्याहून एखाद-दीड वर्षांनी मोठा म्हणजे माझ्याच एवढा असेल. आणि आई-वडील आणि आज्जी असे कुटुंब. वरच्या मजल्यावर तिच्या विधवा काकू राहतात.
उदय तर संमोहित झाल्यासारखाच वागत होता. त्याचे आई-बाबा सुद्धा, मुलगी लुकतुके डॉक्टरांची पुतणी असे कळल्यावर पूर्णपणे निर्धास्त झाले होते. डॉक्टरांचा आणि उदय च्या बाबांचा जुना स्नेह. डॉक्टरांचे नाव मोठे आणि घर हि एकत्र पद्धतीचे. अगदी वैदेहीच्या आजी-आजोबांपासून हे घराणे बाबांना परिचित होते. बहिण भावंडांच्या भरल्या घरात वाढलेली, आणि एकत्र कुटुंबाची सवय असलेली मुलगी म्हटल्यावर उदयचे आई-बाबा आणखीनच निश्चिंत झाले. बघण्याचा कार्यक्रम नाममात्रच झाला, आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना आपला होकार कळवला.
पण दादा-वाहिनी खेरीज कुणीही वैदेही कडे नुसते व्यक्ती म्हणून पहिलेच नाही. जर पाहिले असते तर त्यांचे हि मत दादा-वाहिनी सारखेच झाले असते. दादा-वाहिनी ला वैदेही पाहिल्या भेटीपासूनच अजिबात रुचली नाही. एकतर कृष शरीरयष्टी च्या आपल्या भावाला एवढ्या स्थूल ठेवणीची वधू कितपत शोभेल हा पहिला प्रश्न दादाला पडला. एकवेळ बाह्य रूप जरी बाजूला ठेवले तरी तिची बेफिकीर उर्मट नजर, ताठ्याने भरलेली बॉडी लँग्वेज वाहिनीच्या नजरेतून सुटली नाही. वाहिनीने किंचित नाराजी व्यक्त करताच उदय ने तत्काळ तिला खोडून काढले आणि अति चिकित्सा करण्याबद्दल हटकले. अशा तर्हेने साखरपुडा हि झाला. साखरपुड्याला आलेले सर्व पाहुणे नवरीला बघून अचंबित झाले होते. असे स्थळ उदय च्या घरच्यांनी का म्हणून पसंत केले हेच कुणाला उमगेनासे झाले.
साखरपुडा आणि लग्न ह्या मध्ये ६ महिन्यांचा कालावधी होता. एवढ्या अवधीतही दादा-वाहिनी आणि वैदेही चे सूर कधीच जुळले नाहीत. वैदेही नेहमीच एक प्रकारच्या गुर्मीत वावरत असे. तिचे लोकांच्यात मिसळणे पूर्णतः कृत्रिम आणि अनैसर्गिक भासत असे. दादा-वाहिनीला सतत काहीतरी खटकत होते. वर वर सगळे छान होते. तयारी जोरदार सुरु होती. वैदेही च्या घरचे हौशी होते. पण जिथे घरात येणाऱ्या नव्या सदस्या बद्दलच म्हणावी तेवढी खात्री वाटत नव्हती, तिथे ह्या वरवरच्या गोष्टी काय कामाच्या? दादा आणि वाहिनी चा विचार हळू हळू पक्का झाला. त्यांनी जवळच असलेल्या दुसर्या जागेत वेगळी चूल मांडायचा निर्णय घेऊन टाकला. आपल्या भावजयीने आपल्या आई-बाबांना आपलेसे केले तरी खूप झाले, हे ओळखून दादाने हा निर्णय घरी सांगितला. त्य दोघांच्या अपेक्षे प्रमाणे या निर्णयाचे अतिशय थंड स्वागत झाले. उलट थोडा वाईट पणाच पदरी पडला दोघांच्या. पण याला दुसरा इलाज नव्हता.
लग्न दणक्यात झाले. उदय-वैदेही केरळ ला गेले. ते आल्यावर महिन्याभरातच दादा-वाहिनी ने वेगळी चूल मांडली. इकडे वैदेही चा जॉब हि सुरु झाला . मार्केटिंग चा जॉब म्हणजे सतत शहरभर फिरती. जाण्याची वेळ ठरलेली पण परतायची नाही. रात्रीचे ९ काय, १० काय नवी नवरी घराबाहेर. घरी आल्यावर सुद्धा स्वारी तडक आपल्या खोलीत आणि दार बंद. घरातल्यांशी कुठलाच संबंध नसल्या सारखे तिचे बेबंद वागणे हळू हळू उदय च्या आईला खटकू लागले. सकाळी ९-१० ला उठणे, स्वतःचे आवरणे कि घराबाहेर पडणे. काही महिने वाट पाहून उदयने आईच्या सल्ल्याने तिला जॉब बदलायला अथवा सरळ सोडायला सांगितले. आता सगळे ठीक होईल असे आईला वाटत होते. व्याही सुद्धा मानपानात कसली कसूर ठेवत नव्हते. सर्व वर्ष सण व्याह्यांनी, उदयच्या आईबाबांच्या मनासारखे साजरे केले. जी कसूर त्यांच्या मते, मोठ्या सुनेच्या माहेरी राहून गेली होती, ती सर्व नवीन व्याह्यांनी भरून काढली होती.
किती महत्व देतो ना आपण असल्या फालतू गोष्टींना? सर्व घराचे मांगल्य हे बाहेरून घरात आलेल्या बाईवर अवलंबून असते. माशी जर तिथेच शिंकली असेल तर ह्या मानपानाच्या झालरी काय कामाच्या. इथे हि तसेच झाले. जॉब सुटला तरी वैदेही चा पाय काही घरात टिकला नाही. स्वतःचे आवरून सकाळी ११ च्या सुमारास खोलीबाहेर यायची ती बाहेर जायच्या तयारीनेच. मग उगवायची थेट वाढलेल्या पानावर. दुपारची वामकुक्षी ३-३// तासांची. संध्याकाळी परत बाहेर ते रात्री परत वाढलेल्या ताटावर हजर. घरातल्या कुठल्याच बाबतीत इंटरेस्ट नाही, माणसांची आवड नाही, बिनधास्त वर्तणुकीत स्वतःला धन्य मानणारी वैदेही बेताल वागत होती आणि उदय तिच्या प्रत्येक वर्तणुकीचे थातूर मातुर समर्थन आईबाबान पुढे करीत होता.
जॉब सुटल्यानंतर वैदेहीचा घरातील पहिला गणेश -उत्सव आला. दादा वाहिनी हि आले होते. हरताळके ची पूजा नुकतीच आटोपली होती. वैदेही खोलीत गुडूप झाली होती. आणि बाकी मंडळी इतस्ततः पेंगुळली होती. इतक्यात दादा-वाहिनीला अतिशय प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. दोघांनी चमकून एकमेकांकडे आणि लगेचच आईकडे पाहिले. आई सुद्धा कावरी बावरी झाली. एक उग्र दर्प उदय-वैदेही च्या खोलीतून येत होता. एव्हाना दादा-वाहिनीने तो दर्प ओळखला होता. आणि उदय ने हे काय नवे खूळ डोक्यात घेतले आहे असे आईला विचारणार, तोच दादाच्या लक्षात आले कि आपणच उदयला हार आणायला बाहेर पाठवले होते. आणि खोलीत तर वैदेही होती. आई, दादाच्या मनातील संशय ओळखून आणखीनच गार पडली. तिला जे काही दिवसांपासून जाणवत होते ते दादा-वाहिनी ला आल्या आल्या कळले. नव्हे आता तर त्यावर शिक्का मोर्ताबच झाले. त्या दिवशी, हरताळके च्या पूजेनंतर घरातले मांगल्य कायमचे हरपले. वैदेही ला सिगारेट चे व्यसन आहे हे कळताच मंडळी नखशिखांत हादरून गेली.
उदय ला याबाबत जेव्हा आईने जाब विचारला तेव्हा तो म्हणाला," अग, लग्नाआधी ती मला मोघम बोलली होती, पण मला वाटलं कि जाईल सवय हळू हळू. पण ती सवय फार पुढे गेली आहे. ती लग्न आधी बर्याचदा बिनधास्त पानपट्टी च्या ठेल्याशी जाऊन ओढत असे. पण आता तरी तसे करू नको, आमची लाज जाईल ,असे मी तिला बजावले आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून, सवय सुटेपर्यंत तिला मी आपल्या खोलीतच ओढ असे सांगितले आहे."
आईने कपाळावर हात मारून घेतला. उदय ने तिला यातले काही बाबांच्या कानावर न घालण्या बाबत विनवले. दादा तर कमालीचा खवळला होता. पण उदय च्या पडते घेण्याचा त्याला जास्त राग येत असे. दादाचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे. पण उदय आधीच मवाळ , त्यात स्वतः घेतलेला निर्णय आता कसाही करून साजरा करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. तो वैदेहीला सांभाळून घेण्याबाबत ठाम होता. हळू हळू ती निवळेल व कौटुंबिक प्रवाहात सामावेल अशी त्याला अशा होती. आईला त्याने कसे बसे थोपवले होते. दादा-वाहिनीला हि, आता आपला वेळीच वेगळे व्हायचा निर्णय अजिबात चुकला नाही, हे पुन्हा एकदा पटले. नवरा बायकोशी जमवून घेतोय न, घरातल्यांशी तिचे न का जमेना, असे मानून आईनेही आपली समजूत काढली. तरी व्हायचा तो त्रास कोणालाही चुकला नाही.
एकत्र कुटुंबातून आलेल्या वैदेहीने एकदाही त्यातले संस्कार उचलल्याचे आपल्या वर्तणुकीतून दर्शविले नाही. उलट आपल्या वाट्याचे कुणी हिरावून तर घेत नाही न याचीच तिला सतत धास्ती असे. दादा-वाहिनी जेवायला आले कि मुद्दाम त्यांच्यासमोर पोळ्या किती शिल्लक आहेत ते मोजणे आणि तसा उल्लेख करणे, आपापल्या वाढदिवशी दोघांचे चोरून केक आणून दोघांपुर्तेच सेलेब्रेत करणे असल्या गोष्टींचे घरात वैदेहीमुळे पेव फुटले. सर्वांच्या हे लक्षात येई. दादा तर घरी आल्या आल्या, आईने काही खायला दिले, तर प्रथम विचारी ,कि हे वैदेही ने नाही न आणले आणि मगच त्याला तोंड लावी. घरी येणारे पै-पाहुणे यांच्याशी हि वैदेही ने कधीच काहीच सोयर-सुतक ठेवले नाही. साधे बाहेर येऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचीही तिने कधी तसदी घेतली नाही. एकदा ओळख झालेल्या व्यक्तीला ती परत ओळख दाखवेल याची शाश्वती नसायची. वाहिनीवर तर ती आधीपासूनच खार खाऊन होती. जणू काही माहेरून ती शिकूनच आली असावी कि सासू आणि जाऊ यापासून सुरक्षित अंतर ठेऊनच वागावे, असेच तिचे दोघींशी वर्तन असे. त्यात वाहिनी आपल्या सासूची एवढी लाडकी म्हणून तिचा आणखी तिळपापड होई.
मग यथावकाश उदय आणि वैदेहीला एक गोंडस बाळ झाले- साहिल. आईला तर लहान मुलांचा प्रचंड लळा. आजी साहिल चे सर्व काही अत्यंत मायेने करायची. अनेकदा पहाटे रडणाऱ्या, जागवणार्या साहिल ला उदय, आजीकडे आणून सोडी आणि काही क्षणात आजी त्याला गाणी ऐकावीत झोपवे. त्याच्या खाण्या-पिण्याकडेही आजीचे जातीने लक्ष असे. पण वाहिनी ने जसा सोहम च्या बाबतीत आपल्या सासूवर डोळे मिटून विश्वास ठेवला तसे वैदेहीचे नव्हते.
एखाद्या मोलकरणीला विचारावे तसे बाहेरून आल्यावर वैदेही सासूला विचारी," अहो आई, त्याला काही खायला दिलंत कि नाही?" वास्तविक आईकडे तो काही ताक्ररीविना छान राहत असे. पण केलेल्याची जाण ठेवील ती वैदेही कसली.
हा रोजचा मनस्ताप आता आईला सहन होईना. वैदेही बदलायची चिन्ह दिसेनात. तशी नाईलाजाने आईने बाबांना, उदय-वैदेही ला वेगळे बिर्हाड करून देण्याची गळ घातली. वरची जागा रिकामी झाली तशी बाबांनी दोघांना आपला निर्णय कळवला. त्यावर बेदरकारपणे उत्तर मिळाले," जातो आम्ही वर, पण जास्त दिवस इथे नाही राहणार. वाहिनी वेगळी झाली तर तिला ५ खोल्यांचे घर दिले, तेवढे तरी आम्हाला द्यायचे. आम्हाला नाही राहायचे ३ खोल्यात."
आई-बाबांना वाईट वाटले, पण अजूनही कठोर शब्दात उदयची कान-उघडणी करायचे त्यांच्या मनाने घेतले नाही. हि कसली वेडी माया?. केवळ मुलगा दुरावेल या भीतीपोटी त्याच्या सर्व चुकांवर पांघरून घालण्याचा हा कसला अट्टाहास? दादा-वाहिनीला हा जगावेगळा न्याय काही केल्या समजेना. ती दोघं निमूट सर्व पहात आणि गप्प बसत. आपलं कर्म नेटाने करीत राहायचे एवढेच त्यांनी ठरवले होते. बाबांनी ३ खोल्यात पूर्ण रिनोवेशन करून फुल्ली फर्निश्ड ब्लॉक उदय च्या ताब्यात दिला. मंडळी दिवाळीच्या सुमारास वर राहायला गेली आणि आईने निश्वास टाकला. वाहिनी कित्ती वर्षांनी या दिवाळीत मुलांना घेऊन मोकळेपणी सासरी राहिली. घराचे ग्रहण थोडे का होईना सुटल्यासारखे वाटत होते. वर्षभरात आई-बाबांनी अनेक सहली केल्या. काश्मीर, केरळ,गोवा. खूप ठिकाणे फिरून आली दोघं.
सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असताना एकदा आई दादाला म्हणाली," अरे, परवा वैदेही कामाला बाहेर गेली होती आणि साहिल ने इकडे खाली कपडे ओले केले, म्हणून मी वर त्याचे कपडे आणायला गेले आणि कपाटात मला पुन्हा सिगारेट ची पाकिटे सापडली. काय करू रे, उदय च्या कानावर घालू का परत? मला तर काहीच सुचेनासे झाले आहे."
दादा ने तिला समजावीत म्हटले," सोडून डे आता, काही सांगायच्या फंदात पडू नकोस, नक्कीच उदय ला याची पूर्ण कल्पना आहे. त्यांचे ते आता बघून घेतील. "
पण नातवासाठी आजीचा जीव तुटत होता. त्याच्या बालमनावर ह्या वाईट सवयीचे पुढे होणारे दूरगामी परिणाम आजीला दिसत होते. पण आता वेळ निघून गेली होती. आजीला कळून चुकले होते, आपल्या हातात आहे तेवढे साहिल साठी करत राहायचे, पुढे तो आणि त्याचे नशीब.
आणि एके दिवशी आक्रीत घडले. आजी हृदयविकाराच्या झटक्याने तडकाफडकी भरल्या संसारातून निघून गेली. घरचे दारचे हळहळले. बाबा खचले. वहिनीची तर जणू आईच गेली होती. आता बाबा एकटे उरले मोठ्या घरात. उदय वर वेगळा झालेला, दादाही वेगळा झालेला. पण तिसर्या दिवशी दादा-वाहिनीचा निर्णय झाला होता. ते परत बाबांजवळ जुन्या घरी येणार होते. जवळच्या लोकांना हेच अपेक्षित होते. त्यांना एव्हाना कर्ता मुलगा कोण हे कळून चुकले होते.
साहिल आता थोडा मोठा झालाय. ३-४ वर्षांचा. आजी गेली तेव्हा आठवडाभर कावरा बावरा झालेला साहिल, आता आपल्या चुलत भावंडांशी खेळायला, खाली काका-काकू आणि आजोबांकडे येतो. त्याला मुलांची, माणसांची ओढ आहे. खाली असताना इतका रमतो कि दरवेळी जबरदस्तीने रडवून वर न्यावे लागते. पण हल्ली त्याचे वागणे वात्रट पणाच्या सीमारेषा ओलांडून फाजील पणाकडे जात असल्याचे दादा-वाहिनी च्या लक्षात आले आहे. तो रस्त्यात पडलेल्या सिगरेट च्या थोटका कडे बोट दाखवून ' हे आईचे' असे सांगतो. डाव्या तळव्यावर उजव्या तर्जनीने चोळल्या सारखे करून खोटे खोटे तोंडात काहीतरी खाऊन दाखवतो. त्याच्या तोंडात नको ते शब्दप्रयोग आलेत. कुणी रागावले, धाक दाखवला तर आक्रस्ताळेपणा करतो. त्याला सांभाळणाऱ्या बाईला फटाफट मारतो आणि बोच्कारतो. उदय त्याला वेळच्या वेळी ओरडत दटावत असतो, पण आई म्हणून वैदेही अजिबात त्याचे कान पिळत नाही. उलट त्याच्या फाजील चाळ्यांना तीच प्रोत्साहन देत राहते.
बाबा तर वास्तुशांत करून दिल्यापासून वरच्या घरची पायरीही चढलेले नाहीत. वैदेही सुद्धा कधी त्यांना आणि माहेरच्या माणसांशिवाय कोणालाच बोलावत नाही. बाबा तिला काडीचीही किंमत देत नाहीत, पण केवळ मुलाची बायको म्हणून सहन करतात.
बाबांचा एरव्ही जगप्रसिद्ध दरारा उदय च्याच बाबतीत कुठे लोप पावतो, हे आप्तस्वकीयांना अजूनही न उमगलेले कोडे आहे. पण दादा ने तोही अंदाज बांधला आहे. एकतर मुलावारची आंधळी माया, त्यात बघून ठरवून केलेले लग्न, अशा पेचात बाबा सापडणे स्वाभाविक आहे. उदय जरी खंबीर असता आणि वैदेही चुकतेय असे त्याने आधी स्वतः पाशी आणि घर्च्यान्पाशी कबूल केले असते, तरी बाबांनी त्याला या गर्तेतून बाहेर काढले असते. पण हेच उदय करीत नाही.
आजही वैदेही बद्दल उदयची काही कान-उघडणी केली तर दादा-वाहिनी च्या वाट्याला वाईट पणा खेरीज काही येत नाही. तो अजूनही तिच्या वागण्याचे समर्थनच करतो. तिचे व्यसन सुटणार नाही हे आता त्याने स्वीकारले आहे. त्याचे आपल्या मुलावर होणार्या दूरगामी परिणामान बद्दल त्याने सोयीस्कर पणे वेड पांघरलेय.
अशा प्रकारे ' विनाशकाले विपरीत बुद्धी' चा पाढा अजूनही चालूच आहे.......................................................................................................................