Tuesday, May 5, 2015

so smart of us


किती सोप्पं झालंय न सगळं 
या स्मार्ट फोन ने जग हातात आणून दिलंय
आपण आणि आपला फोन ……. बस यांचच एक चिरेबंदी जग 
त्यात शेजारी बसलेल्या ला शिरकाव नाही …. 
पण आपण मात्र फोन मधून तिऱ्हाई ता च्या जगात मनसोक्त फेरफटका मारून येऊ शकतो 
एका हाताने , आपल्या खाजगी आयुष्यातले सौख्य जगाला दाखवत ,
दुसर्या हाताने त्याच सौख्याला दृष्ट हि लावू शकतो … कसं काय ?

 जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं याच्या सीमारेष्या स्मार्ट फोन ने  इतक्या धूसर केल्या  आहेत 
कि आपल्याला वाटतच नाही आपण काही गैर किंवा अवैध करतो अहोत. 
किंवा असं म्हणू हवं तर, पूर्वी पर्याय नसे म्हणून तरी आपण एकनिष्ठ राहत असू, 
आता ते दिवस केव्हाच मागे पडले …… 
तुम्ही, आम्ही अगदी कुणीही , मनात येता  क्षणी, या स्मार्ट  फोन च्या कृपेने आपली वाट वाकडी करू शकतो . 
पूर्णपणे खाजगीत , जोडीदाराला शंका हि न येता . घराबाहेर सुद्धा न पडता . 
पर्सनल मेसेजेस च्या स्वरूपात सुरु होणारं साधसं च्यॅटिंग कधी चावट  गप्पां चा रस्ता धरत, 
अतिशय इंटीमेट आणि गहिऱ्या संबंधांमध्ये परिवर्तित होतं ………  आपलं आपल्याला हि कळत नाही 
खरं म्हणजे कळत सगळं असतं , पण वळत मात्र नाही .  

पूर्वीचे माणूस ओळखायचे ठोकताळे केव्हाच गळून पडले . 
एखाद्याची नजर, वागणं बोलणं , पेहराव यावरून एखाद्या ची चाल , वळण लक्षात येत असे . 
आता कोणाबद्दल आडाखे बांधायची सोय राहिली नाही . 
आपलीच एखादी मैत्रीण , शेजारी, ओळखीतले काका, अगदी घरातला कोणी सदस्य ……. 
कोणाचा स्मार्ट फोन कोणाचे काय काय अंतरंग दाखवेल याची शाश्वती  नाही . 

सगळ्या गोष्टी सोप्प्या केलेल्या स्मार्ट फोन ने हे बाकी अवघड करून ठेवले आहे . 

anubandh

कामवाली बाई शी आपले संबंध हे एक अजब रसायन आहे.
 एका प्रकारे वाळवंट च …… कितीही काहीही पेरा , खत पाणी घाला , निगा राखा …. ते उजाड आणि ओसाड च राहतं .
क्वचित कधी आभास होतो मृगजळाचा …. पण फार काळ टिकत नाही तो आभास …. 
पण काही आभास त्या त्या काळा पुरते का होईना , इतके खरे असतात , आणि इतक्या सुखद  आठवणी देऊन जातात , कि ते क्षण मनात कायम जपले जातात . 

अशाच काही जणी मनात घर करून बसल्या आहेत . 

शिडशिडीत बांधा , सावळा वर्ण , दोन्ही खांद्यावरून पदर , चेहऱ्यावर धीर गंभीर तरीही मृदू भाव  अशा सविता बाई माझाकडे पोळ्या करून द्यायच्या . शांतपणे  येउन आपलं काम करून जायच्या . फार काही बोलाचाली व्हायची नाही त्यांच्याशी . आपण बरं आणि आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव . पोळ्या स्वैपाकाच्या कामा सोबत त्या बाळ बाळनतिणी ची कामं सुद्धा करायच्या . साहजिकच सावनी च्या वेळी स्वैपाक आणि बाळा च काम आपसूक त्यांनाच सोपवलं . 
काम करता करता त्या मूकपणे पाहत असत . त्या वेळी हळवं झालेलं माझं मन सहजपणे त्यांच्या पाशी मोकळं व्हायला लागलं . त्या अल्प संभाषणातून त्या काय समजायचं ते समजल्या …. आणि मग मात्र त्यांनी जणू माझं पालकत्व च घेतलं .
 रोजचं बाळा च आवरल्यावर त्या स्वैपाक घरात जात , मला टेबलाशी ताट देऊन बसवत आणि गरम गरम भाकरी वाढून खायला लावत . कधी भाकरी सोबत खीर करून देत . एकदा माझासाठी पाया सूप केलं आणि बाळनतिणी ने ते पिणं किती पौष्टिक आहे हे पटवत मला प्यायला लावलं . 
त्यावेळी माझी नेमकी गरज त्यांनी ओळखली होती …......... ………… ………………. 
त्यांनी मायेनं केलेल्या  या छोट्या छोट्या गोष्टींनी मला त्या  त्या क्षणी काय आणि किती किती दिलंय याचं मोजमाप होऊच शकत नाही . 

त्या पाठोपाठ आठवते योगिता . गोबऱ्या गालाची , उंच , भरल्या अंगाची , पण अतिशय निरागस डोळ्यांची योगिता केर फरशी भांड्यान साठी माझाकडे कामाला होती . 
तुटल्या विखुरल्या घरातून आलेली योगिता , काका काकी जवळ राहायची . कामं करून पैसे कमावून काकी कडे सुपूर्द करायची . 
लहान वयात आलेलं मोठेपण , जगाने शिकवलेलं शहाणपण तिच्या टपोऱ्या डोळ्यात साठलेलं असायचं . मग कामावर आली कि माझाशी बोलता बोलता सगळं साचलेलं उसनं अवसान त्याच टपोऱ्या डोळ्यांवाटे घळा घळा गाला न वरून ओसंडून जायचं .
 घटका दोन घटका बोलणं … पण कुणी ऐकून घ्यायला आहे , हा दिलासा तिला पुढचे अनेक दिवस पुरायचा . आपली कर्म कहाणी ऐकवून , त्या बदल्यात तिला काही नको असायचं , न कसली मदत न सवलत . त्या विसाव्या च्या क्षणांनी , क्वचित माझ्या वडीलकी च्या शब्दांनी त्या क्षणी तिच्या मनाला हवी असलेली फुंकर तिला मिळायची आणि ती डोळे पुसून, ओढणी खोचून पुढल्या कामाला निघून जायची . लग्नं ठरल्यावर चेहऱ्यावर वेगळंच तेज घेऊन यायची ती . जणू दिवस पालटल्या ची ती नांदी होती . आणि खरच तिचे  दिवस पालटले . लग्न होऊन दोन बाळांची आई झालेल्या योगिता ची खुशाली अधून मधून कळत  असते . 


योगिता ने काम सोडायच्या सुमारासच अनिता घरात आली .
 काळी सावळी , तीक्ष्ण पण गांगरलेल्या नजरेची आणि अंगाने कटक अनिता महाड नजीकच्या गावाहून माझाकडे कामासाठी राहायला आली .
 अचानक आपलं घर , माणसं सगळं सोडून आमच्या सारख्या  अनोळखी लोकांसोबत राहायला आलेल्या त्या मुलीला सगळंच नवं होतं . नवी जागा , शहरातली राहणी , मागे पडलेलं घर , सगळ्या पायी काही दिवस ती अगदी गप्पं गप्पं असायची . कामापुरतं सुद्धा बोलायची नाही , फक्त काही विचारलं तर उत्तर द्यायची .
 पण घरात बाळ असलं कि कोणीच फार काळ गप्पं राहू शकत नाही . त्या प्रमाणे तीही सावनी ला खेळवताना हळू हळू बोलती झाली . 
पण काही दिवसातच माझ्या लक्षात आलं , कि हि पट्ठी अजिबात नीट  जेवत खात नाहीये . तिला आपल्याकडची गुळमुळीत चव आवडत नाही हे लक्षात आले . तेव्हापासून मी तिला तिच्या चवीनुसार भाजी आमटी करून घ्यायला सांगितलं . 
सर्वप्रथम तिने काय केलं असेल तर ढीगभर कांदा आणि ढीगभर लसूण ढीगभर तेलावर परतून झणझणीत कांदा लसुण  मसाला करून ठेवला . आता रोजच्या भाजीत तो आपल्यापुरता घालून घेऊ लागली , मुख्य म्हणजे व्यवस्थित जेऊ लागली . 
हळू हळू सर्व घरकामाचा ताबा अनिता ने घेतला . स्वच्छ आणि चटपटीत काम न कंटाळता करायची ती . 
सहा महिने रात्रीची झोप विसरलेल्या मला  खऱ्या अर्थाने आराम मिळायला लागला . 
कामाचा व्याप बराचसा हलका झाल्याने मी ………व आमच्या सारखं आमच्या बरोबरीने चांगलं चुंगलं राहणं आणि खाणं पिणं होऊ लागल्याने ती ............................................. दोघीही तब्ब्येतीने  सुधारलो . 
आमच्याशी सूत जुळल्याने म्हणा किंवा स्वकष्टाच्या कमाईतून होणाऱ्या समाधानाने म्हणा ती घरात चांगलीच रुळली . 
पण शेवटी हनिमूनच तो . तीचासाठीही आणि माझासाठीही . तरीही दीड वर्ष टिकला . 
काही दिवसान पासून माझी नजर चुकवून बाहेर ती काही उद्योग करू पाहतेय हे माझा लक्षात यायला लागलं . विश्वासात घेऊन विचारलं तर खरं बोलेना . मग ओळखलं ……आता हि जोखीम सांभाळण शक्य नाही . 
तात्काळ तिच्या पुण्यातल्या दूरच्या भावाला बोलावून तिला निरोप दिला .
 वाटलं होतं हि ही इथूनच लग्न ठरून मार्गी लागेल . तरीही तिने  मनापसून केलेल्या कष्टा चा विसर पडणं अशक्य होतं म्हणून तिचा लग्ना  करिता देण्यासाठी ठेवलेली आहेराची रक्कम भावाकडे देऊन टाकली आणि मनातून तिला शुभाशीर्वाद देऊन पाठवून दिले . 

नुकतीच सहा महिन्यांपूर्वी लग्न होऊन गावी गेलेली नीना . 
तिच्या इतकं भाबडं ध्यान मी आजतागायत पहिले नाही . अगदीच ठेंगणी आणि ठुसकी पण जाडजूड बांध्याची होती नीना . वरकामाला लागली ……मी सांगितलेलं काम अगदी जीव ओतून करायची .
 अगदी तिचं  समाधान होई पर्यंत………. माझं समाधान झालं असण्याशी तिचं काही घेणं देणं नसायचं . त्या पायी तिचे वरकामाचे तास  भरले तरी तिला फिकीर नसायची . तिला उशीर होईल या  जाणीवेने माझी घालमेल झालेली असायची . पण ती निवांत . 
या कष्टकरी जीवाची हि एक अत्यंत दुखरी जखम होती . अर्धवट वयातल्या अर्धवट लग्नाची . त्या पायी लागलेल्या बट्ट्या ची  . त्या पायी आता समज आल्यावर देखील  नव्याने लग्न  ठरण्यात  येत असलेल्या अडचणीची .  ३० शी च्या जवळ येउन  देखील संसाराचे स्वप्न पूर्ण न होण्याची . 
त्या काळजीने म्हणा , दोन तीनदा ठरत येउन मोडलेल्या सोयरिकी ने म्हणा तिने काही काळ अंथरूण धरलं . १५ दिवसांनी बरी होऊन आली तेव्हा परिस्थिती स्वीकारल्याचा भाव त्या भाबड्या चेहऱ्यावर होता . पण आतून उदासच असायची . 
शेवटी नात्यातलाच एका भावाशी सोयरिक जुळली आणि कळी खुलली . होणारा  नवरा भाऊ होता , वयाने तिच्याहून लहान होता , चेहऱ्यावर च नाही तर शरीरभर विद्रूप ते च्या खुणा असलेला होता ..........................................  कशा कशानेच ती डगमगली नाही . साचलेलं डबकं आता प्रवाही होणार यातच तिला सगळं मिळालं होतं .