Thursday, July 7, 2016

जाग

तुला भेटले तेव्हा पासून एक कुतूहल मिश्रित कौतुक वाटत आलंय तुझ्या बद्दल . निसर्गदत्त देखणेपण तुला लाभले आहेच . त्यावर तू आपल्या पेहरावातून व राहणीमानातून आपल्या व्यक्तिमत्वाला नेहमीच आकर्षक राखत आली आहेस .
लहान शहरातून येउन देखील इथे आल्यावर तू स्वहुशारीने तुझ्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचा जम बसवलास . त्यात तुला तुझ्या कुटुंबियांची यथायोग्य साथ सोबत होतीच .
तुझी स्वप्नं विस्तारली . तुला नवी क्षितीज खुणावायला लागली…….
या तुझ्या नवीन ' हटके ' नादाच देखील कौतुक वाटलं तेव्हा . अश्या जगावेगळ्या नादिष्टपणा ला सुद्धा धमक लागते . यातून तुझी असीम आनंद घ्यायची वृत्तीच झळकत होती .
तू त्यात रमत चालल्याच्या सर्व खुणा सर्वत्र जाणवत दिसत होत्या . ते पाहून बरं तर वाटत होतंच तरी पण काही तरी चुकल्या चुकल्या सारखं हि वाटत होतं . तुझं कौशल्य ज्या क्षेत्रात होतं ते कुठेतरी या सगळ्यामध्ये हरवल्या सारखं झालं होतं .
एकदा वाटला हे नवं जग क्षणिक आहे आणि तू त्यात फार काळ रेंगाळणार नाहीस . पण ते झालं नाही . ज्या कौशल्याच्या बळावर माझ्या सारख्या अनेक जणी तुझ्या शी जोडल्या गेल्या होत्या , त्या पासून तू फारकत घेतल्या सारखी वाटायला लागलीस .
आणि ती बातमी कानावर आली .
ती धक्कादायक वाटली पण कुठेतरी अपेक्षित देखील वाटून गेली . त्यातला धक्का हा खरंतर चटका लावून गेला होता . त्या बातमीने तुझ्या कौटुंबिक धाग्यावर अवलंबून असलेल्या निरागस जीवावर होणारे परिणाम तरळून गेले . पण कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसतंय हे दूरवरून तुला पाहणाऱ्या आम्हा सर्वांना जाणवत होतं . त्यामुळे या बातमीने आश्चर्य मात्र वाटलं नाही .
वाईट या गोष्टीचा वाटतं कि तुला ते वेळीच कळलं नाही .
जो हव्यास होत्याचं नव्हतं करतो … तो खरंच त्या लायकीचा असतो का ?
जे स्वप्नं सुंदर शाश्वताला हादरावते … ते उराशी कवटाळयचा अट्टाहास का ?
जितकं लवकर यातून जाग येईल तितकं बरं .
अजूनही वेळ गेलेली नाही . चुका मान्य करायची वेळ कधीच जात नाही .
चुकलेली वाट सोडून आपल्या कळपात परतायची वेळ असेल तर सोडू नकोस .
माझ्या सारख्या तिर्हाईतआला देखील तुझं असं आप्तान पासून दुरावणं त्रास देऊन जातं ग .
सामोरी जा ………. स्वतःला तपासून बघ .
मदत घे हात देणार्यांची . काहीही कर .
पण नको गं ………. नको असं होऊ देउस .