Wednesday, August 29, 2018

Introspection anyone

#introspectionanyone#

निकालाचा दिवस . नवीन भाषा थर्ड लँग्वेज म्हणून कुठली मिळाली हि सर्वांना उत्सुकता .

कुणाला जर्मन कुणाला संस्कृत कुणाला मराठी इत्यादी चर्चा रंगल्या . लगोलग शाळेच्या ग्रुप वर जर्मन क्लासेस  च्या जाहिराती आदळायला लागल्या .नवीन विषयाचा क्लास लावून पालक आता मोकळे होतील .

छान मार्क म्हणजे उत्तम क्लास . कमी मार्क म्हणजे भंगार टीचर .

त्याचे  फंडे 'क्लिअर 'आहेत .

एका ओळखीच्यांनी मुलाला कमी मार्क मिळाल्याचे खापर ट्युशन टीचर वर फोडले . का तर इतके पैसे भरून पदरात मार्क नाहीत म्हणजे काय ? अमुक एका क्लास च्या टीचर मार्कांची हमी देतात . चला धावा  तिकडे .
शाळाबाह्य उपक्रमांचे देखील तेच . एखाद्या खेळात किंवा कलेत आपले मूल प्रवीण असणे किंवा नसणे याला देखील बऱ्याचदा शिक्षक अथवा कोच लाच जबाबदार धरले जाते .
या सगळ्यात सोयीस्कर पणे विसरले जाते ते आत्मपरीक्षण . पालक म्हणून स्वतःचे आणि आपल्या पाल्याचे  .
सर्वात ढोबळ मानाने लावला जाणारा निकष म्हणजे आपल्यासारखेच आपले मूल  एखाद्या उपक्रमात निपजणे हा आग्रह . आपल्याला अनुकूल असे आपले गूण मुलात उतरले आहेत का नाही हे तपासून घ्यायला थोडा अवधी तरी हवा .
बरं आवड आहे , इच्छा आहे अमुक उपक्रम करण्याची तर अनुभव म्हणून करून पाहूदे , मजा घेउदे , जमल्यास नवीन शिकता येउदे . इतकी बेसिक उद्दिष्ट साध्य झाली तरी खूप झालं . पण छे , आपल्याला सगळ्यात अचिव्हर्स च हवेत . मार्कांची तर आहेच , ती कमी म्हणून आता उपक्रमां मध्ये देखील स्पर्धा चुरस हवीच . आपण हि उतरतो आणि मुलांना देखील उतरवतो . बरं अपेक्षित रिझल्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमांची तरी मुलांची मानसिकता आहे का ? आपली तर आहेच हो . पालक म्हणून आपली ध्येय तर आकाशालाच पोचली आहेत . पण मुलांचं काय ? आपण चारी ठाव खुराक देऊ , पोषक वातावरण देऊ , ने आण करू , थोडक्यात घोड्याला पाण्यापाशी नेऊ ....... ...... पण पाणी प्यायचं का नाही हे आपण नाही ना ठरवू शकत .

आपले मूल अभ्यासात सिन्सिअर नसेल , शाळेत ट्युशन ला टिवल्याबावल्या करत असेल , खेळाचा वर्कआउट मस्ती करत कोच ची बोलणी खात उरकत असेल , कलेत एकाग्र होत नसेल , कुठलीच स्वयंशिस्त ना पाळता जुलमाचा रामराम ठोकत असेल , उलट  या पैकी कुठलीच हयगय आपण मुळीच करत नाही , हे वर भासवत असेल आणि वरील कुठलीही शक्यता नाकारून  आपण डोळे झाकून मुलांचंच खरं मानून त्यांच्या कामगिरी चं खापर शिक्षक , कोच वरच फोडणार असू , तर आपण स्वतःलाच फसवत आहोत , नाही का ?

नुसतं क्लास बदलून , कोच बदलून मार्क , मेडल्स अथवा कुठलच प्राविण्य पदरात पडत नाही , हे आपल्याला कधी कळणार . बऱ्याचदा अंगभूत कौशल्य बाहेर व्यक्त व्हायला ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो , या मधल्या काळात बरेचदा मुलांना आपोआप समज येते , शहाणपण येतं , वय मोठं होतं तसं शारीरिक मानसिक बळ देखील आपसूक वाढतं .
आणि अचानक एक दिवस आपल्याला अपेक्षित ते 'यश 'लक्खपणे समोर येऊन ठाकतं . पण त्यासाठी थोडं थांबायची , वाट पाहायची , योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते . एखाद्या तळमळीच्या शिक्षका कडे आपल्या उतावीळपणामुळे हकनाक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे .
या वर्षीच्या निकालातून आपण या गोष्टीची  थोडीफार  जाण ठेऊन वागू शकतोय का ते पाहूया .