Tuesday, December 25, 2018

EkaNatakachiGoshta

#एका नाटकाची गोष्ट #

" कोणतं माध्यम तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं ?" नट - नट्यांना हा ठरलेला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावर त्यांचं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे - नाटक . खरोखर नाटक या माध्यमाची नशाच वेगळी . कुठलंही  रंगमंचीय सादरीकरण हे सादर करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला विलक्षण भारावून टाकतं .

निवेदक या भूमिकेतून ऑन स्टेज माझा अल्प सहभाग झाला असला तरी ऑफ स्टेज काम करण्याचा नुकताच एक रोमांचकारी अनुभव मला घेता आला . निमित्त होतं , अभिनव प्राथमिक मराठी माध्यम शाळेत स्पोकन इंग्लिश टीचर या नात्याने अंगावर आलेली एक जबाबदारी , ती म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलना प्रित्यर्थ  इयत्ता १ ली आणि २ री च्या मुलांना घेऊन एक इंग्लिश नाटुकले बसवण्याची . गेल्या  दोन महिन्यात  आम्हा ४ टीचर्स चा आणि २५ छोटुकल्यांचा गोड़ ऋणानुबंध जुळून आला .

इंग्लिश स्किट करता आमच्याकडे गोष्ट तयार होती. सर्वप्रथम आम्ही चौघींनी एकत्र बसून ती गोष्ट खुलवली , त्यातली पात्रं ठरवली  , संवाद लिहिले आणि एक पटकथा आकाराला आली . मग आपापल्या गटातील मुलांना बोलावून ऑडिशन्स घेतल्या . प्रमुख ४ पात्रांकरता सुयोग्य निवड केली. तसंच इतर पात्रसंयोजन देखील पार पडलं . दिवाळी सुट्टी लागायच्या आधी एक महत्वाचे काम माझ्या ३ कलिग्जनी केलं . त्या वेळी २ दिवस आईच्या आजारपणमुळे माझा सहभाग कमी पडला . त्या तिघींनी प्रत्येक पात्राच्या वहीत त्याची त्याची वाक्य लिहून चिकटवून दिली . उद्देश हा कि सुट्टीत पालक मुलांकडून वाक्य घोकून घेतील .

दिवाळी सुट्टी संपून मुले आली तेव्हा आमच्या तालमींना खऱ्या अर्थाने सुरवात झाली . सुरवातीला सूचना देऊन , प्रसंगी करून दाखवून काय अपेक्षित आहे ते मुलांना सांगितलं गेलं . काही मुलं ते लगेचच अमलात आणत , काहींनी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला काळजीत टाकलं . तालमींच्या बरोबरीने एक नवी शोध मोहीम उघडली गेली - बॅकग्राउंड म्युजिक आणि स्किट नंतरचा छोटा डान्स साठी लागणारं गाणं - याची . गूगल सर नेहमीप्रमाणे मदतीला धावून आले . मधेच लक्षात येई कि एक दोन मुले त्यांची वाक्य नीट वठवू शकत नाहीयेत . त्यांना थोडे सोपे  कमी लांबीचे संवाद दिले गेले. त्याच्या त्यांच्यात पात्रांची अदलाबदल करताना त्यांना अंजारत  गोंजारत न  दुखावता केलं जाईल याची खबरदारी घेतली गेली . त्यानंतर गूगल व्हिडीओ बरहुकूम डान्स च्या स्टेप्स बसवल्या .

आता वेळ आली ड्रेस ठरवायची . त्यासाठी पालक सभा बोलावली .पात्रानुरूप प्रत्येकाचा ड्रेस काय आणायचा ते समजावले . रंगांची थिम असल्यामुळे ब्लू जीन्स आणि त्यावर त्या त्या रंगाचा टी -शर्ट असा सुटसुटीत मामला होता. मुख्य ४ पात्रांना विशेष वेशभूषेच्या सूचना दिल्या . मेकअप , कानात गळ्यात हातात , हेरबॅन्ड , सॉक्स  सगळं तपशीलवार समजावून दिले.

तालमींदरम्यान मजा मस्ती चालू असे हे म्हणणे म्हणजे भयंकर अंडर स्टेटमेंट ठरेल . जरा ब्रेक मिळाला कि २५ फटाके चौफेर फुटत आणि त्यांना आवरता आवरता आम्हा चौघींच्या नाकी नऊ येत. काही नाठाळ गुंड्या भाऊंनी त्यांना आपण का बरं घेतलं , असा सवाल वेळोवेळी आम्हाला पाडला . आता राहिलं होतं काम प्रॉप्स बनवण्याचं . त्यात एका मोठ्या स्पेस शिप चं कट आउट बनवायला लागणार होतं . हे अवघड काम एका छोटीच्या ९वि तल्या ताईने सुबकरीत्या करून दिल्यामुळे आमचा मोठाच भार  हलका झाला. दुसरे छोटे प्रॉप्स आम्ही एका दिवसात तयार केले. आता प्रॉप्स सोबत देखील तालमी करता आल्या .

 एका प्रॅक्टिस ची  ट्रायल रन प्रिन्सिपॉल मॅडम ना दाखवली गेली. त्यात एक बारीक सुधारणा सुचवण्यात आली . त्या नुसार मुलांच्या हालचालींत गतिमानता यावी म्हणून शक्कल लढवली. एका छोटीने तर कमालाच केली . मैत्रिणीने इंग्लिश स्किट मध्ये नाव दिले म्हणून  हि पठ्ठी ऑडिशन ला न येताच आपले हि नाव दिलेय असे वर्गशिक्षिकेला आणि पालकांना सांगून मोकळी झाली. ती कधी नाटकात नव्हतीच हे तिला , तिच्या शिक्षिकेला आणि आईला समजावणे इतके कठीण होऊन बसले कि त्यापेक्षा तिला पटकन आयत्या वेळी कुठेतरी सामावून घेणे सोपे असे आम्हाला कळून चुकले . मग एका टीचर ने तिला डान्स मध्ये स्पेशल रोल आणि स्पेशल स्टेप्स देऊन खुश करून टाकले आणि स्वतः सुटकेचा श्वास घेतला.

तालमींना अडथळे काही कमी नाही आले. मुले  गैरहजर राहणे, मधेच इतर स्पर्धांना बोलावले जाणे, मधेच MR लसीकरणाचा दिवस असणे, अशा व्यत्ययांसकट तालमी चालू होत्या. शेवटी शेवटी मुलांना गाणे थांबल्यावर प्रेक्षकांना पाठ न दाखवता कसे हळू मागे मागे यायचे ते शिकवले. शेवटच्या ३ तालमी कुठल्या ही सुचने , सुधारणे शिवाय त्यांना सलग करू दिल्या आणि कंटिन्युइटी चा फील येऊ दिला. अगदी शेवटच्या दिवशी प्रत्येकाला तुम्ही कसे आउट ऑफ द वर्ल्ड परफॉर्मन्स करताय हा खोटा का होईना पण त्या क्षणाला कामी  येणारा कॉन्फिडन्स बूस्टर चा जालीम डोस दिला.

१५ डिसेंबर , गॅदरिंग चा दिवस उजाडला. ठरल्या वेळी पालक मुलांना आमच्याकडे सुपूर्द करत होती. स्टेज वर आपला नंबर येईस्तोवर २५ उत्साहाचे झरे आम्हाला पडझडी, रडारडी,भांडाभांडी पासून हाती पायी धड सांभाळायचे होते. दोघीं कडे मुले , एकीकडे प्रॉप्स आणि एकीकडे साउंड अशा जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या. आमच्या इव्हेंट ची घोषणा होऊन ब्लॅकआऊट होताच, आम्ही तिघींनी पटापट प्रॉप्स मांडले, डान्स च्या जागा दर्शवणाऱ्या गोलाकार रेघा पटापट आखल्या, आणि लाईट्स ला ओके दिले. ४थी साउंड सिस्टीम पाशी आपल्या कामावर सज्ज होती. एकदाचा इव्हेंट सुरु झाला. विंगेत एंट्री आधी आमची प्रत्येकला कौतुकमिश्रित  सूचनेची पेरणी सुरूच होती. सर्व मुलांनी अपेक्षेपेक्षा बहारदार परफॉर्मन्स सादर केला. आमची २ महिन्यांची धास्ती १० मिनटात संपुष्टात आली आणि तिचे अतीव समाधानात रूपांतर झाले.

या सर्व प्रवासात ४ डोकी अथक नाटका  भोवती नाटका  साठी चालत होती. आयडिया फुलत होत्या, कधी उचलून धरल्या जात होत्या कधी मोडीत काढल्या जात होत्या. पण कुठेही पर्सनल इगो आड येऊ न देता, घेतलेला डिसिजन लगेच  स्वीकारला जात होता. उत्तमोत्तम सादरीकरणाचा १०० टक्के प्रयत्न या मूळ उद्देशाला कुठेही धक्का न लावता आमची हीटेड डिस्कशन्स चालू होती. आमच्या AIEL डिपार्टमेंट हेड सीमा मॅडम ने अतिशय उपयुक्त इनपुट्स दिले.

नशा हि नुसती ऑन स्टेज नाही तर ऑफ स्टेज देखील असते, लहान मुलांना हाताळताना किंबहुना काकणभर जास्तच याची प्रचिती आली. त्याच बरोबर आजवर कधी न लक्षात आलेले  आमच्या तसेच आमच्या मुलांच्या शिक्षकवर्गाचे ज्ञानदाना व्यतिरिक्त शाळेतील सर्व उपक्रमांकरता खर्ची पडलेले कष्ट लक्खपणे जाणवले. आम्ही केलेल्या छोट्याश्या इव्हेंट पेक्षा कितीतरी पटीने भव्य दिव्य सादरीकरणाची जबाबदारी लीलया पेलताना त्यांच्या नखांची  देखील आम्हाला सर नाही, हे आम्ही जाणतो. तरीही मिळालेला आनंद, समाधान काही औरच होतं .


Saturday, December 8, 2018

चिंता


#चिंता#

बाळाच्या जन्माबरोबर एका आईचा हि जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं आहे . असंही म्हणतात कि बाळाच्या ५वि च्या पूजेला त्याचं भाग्य कोरलं जातं . अगदी तसंच या नवीन जन्मलेल्या आईच्या भाळी कायमची एक गोष्ट कोरली जाते ती म्हणजे चिंता .

या चिंतेचं स्वरूप मात्र काळाच्या ओघात बदलत राहिलं आहे .

उदाहरण म्हणून दोन पिढ्या मागे जाऊन बघितलं तर हे  चिंतेचं स्वरूप कसं बरं होतं ?

त्या काळी गावी होणारा बाळाचा जन्म हा रोजची आन्हिकं पार पाडण्यासारखाच एक भाग होता . त्या काळच्या आई ला १०/१२ पोरं जन्माला घातल्याशिवाय या निसर्गचक्रातून सुटका नव्हती . अखण्ड कामात गढून गेलेल्या त्या माउली ला बाळाचा जन्म एकदा सुखरूप पार पडला कि त्याच्या तब्बेत पाण्याशिवाय दुसरी फारशी कुठली चिंता नसे . नाही म्हणायला सासरी गेलेल्या लेकी बद्दल अंधुकशी चिंता असे .

नंतरची मधली पिढी शिक्षण नोकरी निमित्त शहरात स्थिरावली . या पिढीतील आया मध्यमवर्गीय घर चालवायला  बऱ्याचदा नवर्याच्या बरोबरीने नोकरी करत . तिच्या डोळ्यासमोर सदैव नाचत ते ८. १० आणि ५. १४ हे घड्याळाचे काटे . घरकामात मदत करणारा नवरा हि जणू परग्रहावरची संकल्पना . या सगळ्या घरच्या बाहेरच्या धामधुमीत मूल सगळ्या इयत्ता नीट पास होतंय ना हीच चिंता तिला पुरून उरायची . एव्हाना दूरदर्शन आणि पेपर मासिकातून बाहेरच्या जगातील संभाव्य धोके तिला समजत असत . त्या मुळे  मुलाला संगत योग्य आहे ना किंवा मुलगी ७ च्या आत घरात येत्येय ना या कडे तिचे बारीक लक्ष असायचे .

आता येऊया आमच्या पिढीकडे . जी आता ४० शी ला  आल्यावर या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहायच्या आणि स्वतः वर हसायच्या मनस्थितीत आली आहे .

आमच्या पिढीच्या आयांच्या वाट्याला चहू बाजूंनी ज्ञानाचा भडीमार आला . हेच अतिरिक्त ज्ञान आम्हाला नवनवीन खाचखळगे दाखवतं , पॅनिक करून सोडतं . त्यामुळे आधीच चिंतेने भरून गेलेल्या कपाळावर इंच इंच जागा लढवत नवनवीन चिंतातुर रेषा उमटत असतात.

म्हणूनच जन्मतः ५ मिनिटांच्या आत बाळ रडलं का ?

दीड वर्ष सरायच्या आत ते चाललं / बोललं का ?

३ वर्ष्याच्या आत त्याचा बालवाडी प्रवेश झाला का ?

त्यात कुठे learning / reading / hyperactivity  disorder आढळली का ?

४ री ठाव त्याच्या पोटात पौष्टिक खुराक जातोय का ?

शाळे व्यतिरिक्त extra activity लावलीय का ?

या आणि अशा अनेक गोष्टींकरता आम्ही आया आमचं रक्त आटवत असतो . 
हे कमी म्हणून कि काय हल्ली बालपण सरल्याच्या खुणा देखील फार घाईघाईने दिसायला लागतात.
जणू पुढल्या ताणांची फ्रेश यादी घेऊन कोणीतरी आपल्यावर हसत असतं .
एव्हाना स्मार्टफोन शी मुलांची चांगलीच गट्टी झालेली असते . गेम्स खेळून कंटाळलेलं बालपण आता यु ट्यूब कडे वळत असतं . अभ्यासातून ब्रेक म्हणून हातात सतत फोन येऊ लागलेला असतो. मोठ्या मुलांना  तर स्वतःचाच फोन मिळालेला असतो . अशा वेळी आम्हा माऊलींची तारेवरची कसरत काय वर्णावी . सहजच म्हणून किंवा काहीतरी काम काढून मुलांच्या खोलीत डोकावत राहणं आणि त्यांचं फोनवर नेमकं काय चाललंय हे नकळतपणे हेरत राहणं  हे कौशल्य फार मेहनतीनं कमवावं लागतं  .
तर दर वेळी नवनवीन कल्पना लढवून , मुलांना भावनिक, सामाजिक , ध्येयनिष्ठ का काय ती वळणं लावून (?) एकदा का निर्विघ्न आणि अपेक्षेप्रमाणे मुलांची १२वि पार पडली , कि आम्ही आया सुटकेचा श्वास घेतो. स्वतःसाठी जगायचं ठरवतो (?)  थोडक्यात उधळतो .
आम्हा आयांचे स्वतःच्या वाढीच्या वयातले काही न भरलेले घाव असतात . आता पालक म्हणून आपल्या हातून त्या चुका घडू नयेत या करता आम्ही सदैव दक्ष असतो. हो पण त्या ओघात काही नवीन चुका आम्ही करून ठेवतो ते वेगळं . असो....
प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस वेगळे , त्यामुळे पॅरेंटिंग चे फंडे वेगळे.

पण चिंता हि शाश्वत आहे .

सो...... कूल आई हा भ्रम आहे.

आणि असलंच तर मग काहीतरी गोम आहे .

        

Tuesday, December 4, 2018

Chinta

#चिंता#

बाळाच्या जन्माबरोबर एका आईचा हि जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं आहे . असंही म्हणतात कि बाळाच्या ५वि च्या पूजेला त्याचं भाग्य कोरलं जातं . अगदी तसंच या नवीन जन्मलेल्या आईच्या भाळी कायमची एक गोष्ट कोरली जाते ती म्हणजे चिंता .
या चिंतेचं स्वरूप मात्र काळाच्या ओघात बदलत राहिलं आहे .

उदाहरण म्हणून दोन पिढ्या मागे जाऊन बघितलं तर हे  चिंतेचं स्वरूप कसं बरं होतं ?
 त्या काळी गावी होणारा बाळाचा जन्म हा रोजची आन्हिकं पार पाडण्यासारखाच एक भाग होता . त्या काळच्या आई ला १०/१२ पोरं जन्माला घातल्याशिवाय या निसर्गचक्रातून सुटका नव्हती . अखण्ड कामात गढून गेलेल्या त्या माउली ला बाळाचा जन्म एकदा सुखरूप पार पडला कि त्याच्या तब्बेत पाण्याशिवाय दुसरी फारशी कुठली चिंता नसे . नाही म्हणायला सासरी गेलेल्या लेकी बद्दल अंधुकशी चिंता असे .

नंतरची मधली पिढी शिक्षण नोकरी निमित्त शहरात स्थिरावली . या पिढीतील आया मध्यमवर्गीय घर चालवायला  बऱ्याचदा नवर्याच्या बरोबरीने नोकरी करत . तिच्या डोळ्यासमोर सदैव नाचत ते ८. १० आणि ५. १४ हे घड्याळाचे काटे . घरकामात मदत करणारा नवरा हि जणू परग्रहावरची संकल्पना . या सगळ्या घरच्या बाहेरच्या धामधुमीत मूल सगळ्या इयत्ता नीट पास होतंय ना हीच चिंता तिला पुरून उरायची . एव्हाना दूरदर्शन आणि पेपर मासिकातून बाहेरच्या जगातील संभाव्य धोके तिला समजत असत . त्या मुळे  मुलाला संगत योग्य आहे ना किंवा मुलगी ७ च्या आत घरात येत्येय ना या कडे तिचे बारीक लक्ष असायचे .

आता येऊया आमच्या पिढीकडे . जी आता ४० शी ला  आल्यावर या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहायच्या आणि स्वतः वर हसायच्या मनस्थितीत आली आहे .
आमच्या पिढीच्या आयांच्या वाट्याला चहू बाजूंनी ज्ञानाचा भडीमार आला . हेच अतिरिक्त ज्ञान आम्हाला नवनवीन खाचखळगे दाखवतं , पॅनिक करून सोडतं . त्यामुळे आधीच चिंतेने भरून गेलेल्या कपाळावर इंच इंच जागा लढवत नवनवीन चिंतातुर रेषा उमटत असतात.
म्हणूनच जन्मतः ५ मिनिटांच्या आत बाळ रडलं का ?
दीड वर्ष सरायच्या आत ते चाललं / बोललं का ?
३ वर्ष्याच्या आत त्याचा बालवाडी प्रवेश झाला का ?
त्यात कुठे learning / reading / hyperactivity  disorder आढळली का ?
४ री ठाव त्याच्या पोटात पौष्टिक खुराक जातोय का ?
शाळे व्यतिरिक्त extra activity लावलीय का ?
या आणि अशा अनेक गोष्टींकरता आम्ही आया आमचं रक्त आटवत असतो . 
हे कमी म्हणून कि काय हल्ली बालपण सरल्याच्या खुणा देखील फार घाईघाईने दिसायला लागतात.
जणू पुढल्या ताणांची फ्रेश यादी घेऊन कोणीतरी आपल्यावर हसत असतं .
एव्हाना स्मार्टफोन शी मुलांची चांगलीच गट्टी झालेली असते . गेम्स खेळून कंटाळलेलं बालपण आता यु ट्यूब कडे वळत असतं . अभ्यासातून ब्रेक म्हणून हातात सतत फोन येऊ लागलेला असतो. मोठ्या मुलांना  तर स्वतःचाच फोन मिळालेला असतो . अशा वेळी आम्हा माऊलींची तारेवरची कसरत काय वर्णावी . सहजच म्हणून किंवा काहीतरी काम काढून मुलांच्या खोलीत डोकावत राहणं आणि त्यांचं फोनवर नेमकं काय चाललंय हे नकळतपणे हेरत राहणं  हे कौशल्य फार मेहनतीनं कमवावं लागतं  .
तर दर वेळी नवनवीन कल्पना लढवून , मुलांना भावनिक, सामाजिक , ध्येयनिष्ठ का काय ती वळणं लावून (?) एकदा का निर्विघ्न आणि अपेक्षेप्रमाणे मुलांची १२वि पार पडली , कि आम्ही आया सुटकेचा श्वास घेतो. स्वतःसाठी जगायचं ठरवतो (?)  थोडक्यात उधळतो .
आम्हा आयांचे स्वतःच्या वाढीच्या वयातले काही न भरलेले घाव असतात . आता पालक म्हणून आपल्या हातून त्या चुका घडू नयेत या करता आम्ही सदैव दक्ष असतो. हो पण त्या ओघात काही नवीन चुका आम्ही करून ठेवतो ते वेगळं . असो....
प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस वेगळे , त्यामुळे पॅरेंटिंग चे फंडे वेगळे.
पण चिंता हि शाश्वत आहे .
सो कूल आई हा भ्रम आहे.
आणि असलंच तर मग काहीतरी गोम आहे .