Sunday, April 14, 2019

Nuisance value

डेक्कन जिमखान्यावर सध्या नवीन रुजु झालेले सिक्यूरिटी गार्ड हा आम्हा आयांचा हिरीरीने चघळण्याचा विषय आहे.
हे काका आल्या गेल्या प्रत्येकाला काही ना काही कारण  काढून धारेवर धरतात. आमच्या 5 वर्षांच्या सोडण्या , थांबण्या, आणण्याच्या रूटीन मध्ये आम्ही गेट वर एन्ट्री घेताना कार्ड लावतो मग कधी कार्ड स्वतःजवळ कधी मुलांच्या बॅगेत असं करतो. कधी मुलांना ग्राऊंड वर गेट पाशी सोडून बाहेरची कामे करून येतो, कधी तिथेच कट्ट्यावर बसतो.
या काकांना कार्ड मुलांकडे देऊन आया बाहेर गेलेल्या चालत नाहीत. आयांनी कार्ड आपल्याकडे ठेवावं असा त्यांचा आग्रह असतो. सावनी ला सोडून तडक एरोबिक्स ची वेळ गाठायला मला रोज उशीर होतो कारण दोन्ही वेळा क्लॅश होतात. त्यात स्कूटर पार्क करून तिला गेट वर कार्ड लावून आत सोडून तिच्याकडून ते कार्ड माझ्याकडे घेऊन परत स्कूटर पाशी येऊन मग पुढे जिम ला निघणं या सगळ्याला खरोखर वेळ नसतो. त्यामुळे मी कार्ड तिलाच देते, ती उतरल्यावर मी तशीच गाडी वळवते आणि जिम गाठते. त्यावरून  ते काका रोज कटकट करतात. इतकी की इरीटेट व्हायला होतं. सगळ्या आयांना थोड्या फार फरकाने हाच अनुभव आलाय. त्यामुळे मीच काय तो कर्तव्यदक्ष हा त्यांचा अॅटिट्यूड सगळ्यांच्या डोक्यात जातोय.
असे दोन तीन प्रसंग घडल्यावर एक दिवस ग्राऊंड ला जाताना मी सावनी ला म्हणाले कि आज जर तो मला परत नडला तर मी त्याची कंपलेंट करेन किंवा भांडेन त्याच्याशी.
सावनी मला शांत करत म्हणाली कि नको अगं भांडू वगैरे त्याच्याशी.
तिची हे सांगण्यामागची काळजी मला लगेच कळली. कारण रोड रेज हा अतिशय संतापजनक अनुभव आपण सर्वच रोजच्या धकाधकीत घेत असतो आणि आपणच आपल्या मुलांना त्याबद्दल हेही सांगितलेलं असतं कि ट्रॅफिक चे नियम वाकवणारे मुजोर असतात, आपल्या सारख्यांनी त्यांच्या नादी लागायचं नसतं. असाच काहीसा धोका तिला जाणवला आणि तिने मला भांडू नको म्हणून सांगितलं.
त्यावर मी तिला जे ऊत्तर दिलं ते देतादेताच मला माझ्या विचार आणि आचरणातला फोलपणा जाणवला आणि मी भांडणाचा विचार सोडून दिला.
मी तिला म्हणाले , अगं घाबरू नकोस चांगला कामधंदा करणारी, स्वतःचं कमवून स्वाभिमानानं जगणार्या माणसांपैकी आहेत ते सिक्यूरिटी काका, त्यांच्याशी भांडणं बिल्कुल डेंजरस नाही.
..........................................................

हे बोलता बोलताच मला बापाचा रस्ता आणि बापाची गाडी समजून बुंगाट जाणार्यांपुढे नांगी टाकलेली मी, जिथे जिथे पैसा आणि सत्ता मुजोरपणे एकवटली आहे त्या सर्वांपुढे हतबल झालेली मी, काहीच करू न शकणारी मी दिसू लागले.
जिथे खरोखर बोलायला हवंय अश्या आजूबाजूला घडणार्या घडामोडींवर केवळ आपल्या जिवाला घाबरून चूप बसणार्या मला हे काका नक्की धोकादायक नाहीत हे माहीत असल्यामुळे बोलायला एवढा चेव यावा याची खरंच लाज वाटली.
असं अनेकदा नकळत आपण आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत करतो नाही का?
ती आपलीच असतात गृहीत धरावीत अशी, गेला एखादा शब्द ऊणा अधिक तोंडातून तर काय त्याचं एवढं?
आपलं मन किती साफ आहे हे जोवर आपले शब्द ग्वाही देत नाहीत तोवर ते आपल्या माणसांना कसे पटतील हा विचार आपल्याला शिवत नाही.
तेच तिर्हाईतासमोर आपण असतील नसतील ते मॅनर्स वापरायचा सपाटा लावतो आणि सौजन्याचा कळस गाठतो.

मला जो विचार काकांच्या बाबतीत जाणवला हाच विचार समोरचा आपल्या बाबतीत करेल याची  अपेक्षा करणं चूकच नाही का?
मी सतत एखाद्यासाठी डाफरायला ईझी आणि निरूपद्रवी टारगेट  बनत असेन तेव्हा तो, आपण ऊपद्रव मूल्य बाळगणार्या वर कसे रियॅक्ट होतो हे तपासून बघण्याचं औदार्य दाखवेल तो सुदीन.

Shala

#मज_आवडते_हि_मनापासूनी_शाळा#

लेक : " आई , काल आपल्याला त्या आजी भेटल्या बघ रस्त्यात ?"
आई : "  हो, त्या !.... काय त्यांचं ?"
लेक : " त्या काहीतरी सांगत होत्या त्यांच्या नाती बद्दल, कि ती शाळेत जात नाही, काय भारी ना?"
आई : " हम्म , आहे खरं भारी. " " तिला तिचे आई बाबा घरी शिकवतात . होम स्कुलिंग  म्हणतात याला. "
लेक : " म्हणजे? अभ्यासातून सुटका नाहीच? शी !!! मग काय मजा?"
आई : " अगं , थोडीफार सुटका, पूर्ण नाही काही, म्हणजे तुमच्या सारखी फिक्स शाळेची वेळ नाही, होमवर्क नाही, ठराविक ७/८ विषय ठराविक वर्षी, त्याची कंपलसरी परीक्षा असं  सगळं नाही .
तिचे आई बाबा आणि ती मिळून तिला हवा तो विषय, त्याची हवी ती, झेपेल ती  लेव्हल निवडतात, त्याची तयारी करतात आणि त्यावर परीक्षा देते ती ."
लेक : " ओके , ते बरंय , पण शाळा नाही म्हणजे दिवसभर घरीच असणार ती, बोअर नसेल होत का तिला? "
आई : " काय माहित? तिला लौकर उठून, शाळेत ५ तास बसून, घरी आल्यावर होमवर्क मग ट्युशन या सगळ्यापेक्षा घरी बरं वाटत असेल. "
लेक : " अगं पण मैत्रिणी भेटणार नाहीत, स्कुल च्या , ट्युशन च्या, शाळेत किती मजा असते माहीतच नाही तिला"
आई : " हो का?"
लेक : " मग काय, आल्या आल्या किती सांगायचं असतं मला ,आज काय  झालं शाळेत ते , रिया  ने काय नवीन तारे तोडले,  विश्वजित ने व्हॅन मध्ये कोणता नवीन शब्द सांगितला आणि मी आणि अजून  दोघी सोडून सगळे कसे फिदी फिदी त्यावर हसले, टीचर शी आज माझ्या कोणत्या गप्पा रंगल्या !
आई : " हो माहितेय, काल त्या  म्युसिक टीचर  ना रिटायरमेंट नंतर आजोबांच्या ग्रुप मध्ये गायला  या सांगितलंस ते."
लेक : " आणि आमच्या फेवरीट टीचर्स रोज भेटणार नाहीत हि आयडिया तर खूपच  हॉरिबल आहे. मोनिशा मॅम च्य पाया पडल्याशिवाय मी कुठल्याच स्पर्धेत उतरत नाही, माहितेय ना तुला ?  आणि व्हॉट अबाउट गॅदरिंग आणि स्पोर्ट्स? त्या शिवाय कशी राहू शकते ती? "

चला........ म्हणजे फार काही अन्याय वगैरे करत नाही आहोत आपण मुलांवर, असं एकूणच जाणवून आईने परत एकदा स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली आणि उद्याच्या शाळेच्या डब्याच्या तयारीला लागली.

KehnekoBahutkuchtha

#केहनेको_बहोत_कुछ_था#

कुणीतरी विचारलं कि बऱ्याच दिवसात नवीन काही लिहिलं नाहीस का बरं ?
खरंच, विषय संपले , शब्द गोठले कि जी अल्प  प्रतिभा होती ती आटली ?

प्रतिभा म्हणा किंवा उर्मी म्हणा ती आत धगधगत असतेच . विषय तर  रोज हरघडी आदळत असतात . एखाददुसरी विशेष घटना घडताच त्यातले एक एक पदर बाजूला सारत त्यातील अनेक कंगोरे , सूक्ष्म धागेदोरे लक्ख सामोरे येत राहतात .
हो , शब्द मात्र  अशावेळी हमखास गोठतात .
कधी त्यावर वाढीव जबाबदारीचा दबाव पडतो म्हणून किंवा अजून कशाने पण शब्द फुटेनासे होतात खरे .

आपण स्वस्थ नसतोच आतून , खूप काही घडत असताना आपली कामे यांत्रिक पणे होत राहतात , पण डोक्यात विचारांचा उद्रेक चालूच असतो एकीकडे . मग सावकाश वेळ मिळतो , सगळ्या कल्लोळाकडे तटस्थ पणे बघत असताना , विचारांचा गुंता सोडवत असताना , एकेका घटनेचे अवलोकन करत  असताना चित्र सुस्पष्ट होत जातं , पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळालेली असतात , पण हात मात्र थबकलेलेच राहतात .
लिहावं कि न लिहावं या द्वंद्वात अडकून पडलेले असतात .

घडामोडीं चा वेग इतका प्रचंड असतो कि त्या सोबत लोकांच्या प्रतिक्रिया , सवयी , सल्ले सर्व झेलता झेलता प्रचंड मानसिक थकवा जाणवतो पण काही केल्या लेखणीत मात्र उतरत नाही . ज्या लेखणीमुळे मन मोकळं होतं त्याच लेखणी मुळे आपल्या माणसांबद्दल आजवर वाटलेली काळजी , तळमळ , त्या साठी केलेले निस्पृह प्रयत्न एका क्षणात मातीमोल ठरू शकतात .

"केहनेको बहोत कुछ  था अगर केहने पे आते 
दुनिया कि इनायत हैं के हम कुछ नहीं केहते
कुछ केहने पे तूफ़ान उठा लेती हैं दुनिया
अब इसपे  कयामत हैं के हम कुछ नहीं केहते
उनको ये शिकायत हैं के हम कुछ नहीं केहते "

- मीनल