Sunday, April 14, 2019

Nuisance value

डेक्कन जिमखान्यावर सध्या नवीन रुजु झालेले सिक्यूरिटी गार्ड हा आम्हा आयांचा हिरीरीने चघळण्याचा विषय आहे.
हे काका आल्या गेल्या प्रत्येकाला काही ना काही कारण  काढून धारेवर धरतात. आमच्या 5 वर्षांच्या सोडण्या , थांबण्या, आणण्याच्या रूटीन मध्ये आम्ही गेट वर एन्ट्री घेताना कार्ड लावतो मग कधी कार्ड स्वतःजवळ कधी मुलांच्या बॅगेत असं करतो. कधी मुलांना ग्राऊंड वर गेट पाशी सोडून बाहेरची कामे करून येतो, कधी तिथेच कट्ट्यावर बसतो.
या काकांना कार्ड मुलांकडे देऊन आया बाहेर गेलेल्या चालत नाहीत. आयांनी कार्ड आपल्याकडे ठेवावं असा त्यांचा आग्रह असतो. सावनी ला सोडून तडक एरोबिक्स ची वेळ गाठायला मला रोज उशीर होतो कारण दोन्ही वेळा क्लॅश होतात. त्यात स्कूटर पार्क करून तिला गेट वर कार्ड लावून आत सोडून तिच्याकडून ते कार्ड माझ्याकडे घेऊन परत स्कूटर पाशी येऊन मग पुढे जिम ला निघणं या सगळ्याला खरोखर वेळ नसतो. त्यामुळे मी कार्ड तिलाच देते, ती उतरल्यावर मी तशीच गाडी वळवते आणि जिम गाठते. त्यावरून  ते काका रोज कटकट करतात. इतकी की इरीटेट व्हायला होतं. सगळ्या आयांना थोड्या फार फरकाने हाच अनुभव आलाय. त्यामुळे मीच काय तो कर्तव्यदक्ष हा त्यांचा अॅटिट्यूड सगळ्यांच्या डोक्यात जातोय.
असे दोन तीन प्रसंग घडल्यावर एक दिवस ग्राऊंड ला जाताना मी सावनी ला म्हणाले कि आज जर तो मला परत नडला तर मी त्याची कंपलेंट करेन किंवा भांडेन त्याच्याशी.
सावनी मला शांत करत म्हणाली कि नको अगं भांडू वगैरे त्याच्याशी.
तिची हे सांगण्यामागची काळजी मला लगेच कळली. कारण रोड रेज हा अतिशय संतापजनक अनुभव आपण सर्वच रोजच्या धकाधकीत घेत असतो आणि आपणच आपल्या मुलांना त्याबद्दल हेही सांगितलेलं असतं कि ट्रॅफिक चे नियम वाकवणारे मुजोर असतात, आपल्या सारख्यांनी त्यांच्या नादी लागायचं नसतं. असाच काहीसा धोका तिला जाणवला आणि तिने मला भांडू नको म्हणून सांगितलं.
त्यावर मी तिला जे ऊत्तर दिलं ते देतादेताच मला माझ्या विचार आणि आचरणातला फोलपणा जाणवला आणि मी भांडणाचा विचार सोडून दिला.
मी तिला म्हणाले , अगं घाबरू नकोस चांगला कामधंदा करणारी, स्वतःचं कमवून स्वाभिमानानं जगणार्या माणसांपैकी आहेत ते सिक्यूरिटी काका, त्यांच्याशी भांडणं बिल्कुल डेंजरस नाही.
..........................................................

हे बोलता बोलताच मला बापाचा रस्ता आणि बापाची गाडी समजून बुंगाट जाणार्यांपुढे नांगी टाकलेली मी, जिथे जिथे पैसा आणि सत्ता मुजोरपणे एकवटली आहे त्या सर्वांपुढे हतबल झालेली मी, काहीच करू न शकणारी मी दिसू लागले.
जिथे खरोखर बोलायला हवंय अश्या आजूबाजूला घडणार्या घडामोडींवर केवळ आपल्या जिवाला घाबरून चूप बसणार्या मला हे काका नक्की धोकादायक नाहीत हे माहीत असल्यामुळे बोलायला एवढा चेव यावा याची खरंच लाज वाटली.
असं अनेकदा नकळत आपण आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत करतो नाही का?
ती आपलीच असतात गृहीत धरावीत अशी, गेला एखादा शब्द ऊणा अधिक तोंडातून तर काय त्याचं एवढं?
आपलं मन किती साफ आहे हे जोवर आपले शब्द ग्वाही देत नाहीत तोवर ते आपल्या माणसांना कसे पटतील हा विचार आपल्याला शिवत नाही.
तेच तिर्हाईतासमोर आपण असतील नसतील ते मॅनर्स वापरायचा सपाटा लावतो आणि सौजन्याचा कळस गाठतो.

मला जो विचार काकांच्या बाबतीत जाणवला हाच विचार समोरचा आपल्या बाबतीत करेल याची  अपेक्षा करणं चूकच नाही का?
मी सतत एखाद्यासाठी डाफरायला ईझी आणि निरूपद्रवी टारगेट  बनत असेन तेव्हा तो, आपण ऊपद्रव मूल्य बाळगणार्या वर कसे रियॅक्ट होतो हे तपासून बघण्याचं औदार्य दाखवेल तो सुदीन.