Thursday, June 27, 2019

DusreBalpan

#दुसरे_बालपण#

घरातील ज्येष्ठ वृद्धत्वाकडे झुकू लागले, कि त्याच्या खालोखालच्या पिढीने खूप साऱ्या गोष्टींची मनोमन तयारी करून ठेवावी . घरात पुनश्च बालपण अवतरणार याची खात्री बाळगावी . फक्त मुलांचे बालपण संपून ज्येष्ठांचे चालू झाले एवढाच काय तो फरक . आपल्या मुलांचे नखरे , त्रागा , हट्ट , इत्यादी थरार आपण ज्या संयमाने (?) हाताळले , अगदी तितकाच किंवा त्या हि पेक्षा पराकोटीचा संयम दाखवायची वेळ पुन्हा आपल्यावर येऊन ठेपली आहे हे ओळखावे . संयमाचा कडेलोट झाला कि मुलांवर खेकसण्याचे अथवा एक रट्टा घालण्याचे हत्यार तरी बाहेर काढता येत होते , इकडे ती हि सोय नाही .
ज्येष्ठांचं बालपण जपताना मात्र असली हत्यारं म्यानात गप पडून राहतात . उलट जास्तीत जास्त काळजीने ज्येष्ठांची हि फेज सांभाळावी लागते . कधी कधी एकटेपणामुळे , किंवा एखाद्या आजारपणामुळे , किंवा कधी आयुष्याची वजाबाकी करून आलेल्या वैफल्यामुळे आधीच हळवे  झालेले  यांचे मन कधी कोणाच्या इतक्याश्या बोलण्याने दुखावेल सांगता येत नाही . आपल्या आवाजातील बारीकशा चढउताराने किंवा आपल्या देहबोलीत झालेल्या फरकाने देखील ज्येष्ठांना नाकारलेपणाची जाणीव होऊ शकते .
अगदी आपल्याच दोन मुलांमध्ये जसा दोन टोकांचा फरक असतो , अगदी तसाच फरक या ज्येष्ठांमध्ये असतो . त्यामुळे प्रत्येकाला समजून घ्यायची पद्धत एकसारखी असूच शकत नाही .
काही ज्येष्ठ अगदी उत्साहाचे झरे असतात . त्यांना आयुष्य भरभरून जगण्याचे गमक गवसलेले असते . ते सदैव स्वतःच्या डोक्याला , मनाला आणि शरीराला चालना मिळतील अश्या छंदात , उद्योगात रममाण असतात . त्यांची सदा सर्वदा सकारात्मक वृत्ती अतिशय कौतुकास्पद असते .
 यातल्या काहींना मात्र गमतीदार सवयी असतात . समोर श्रोता मिळाला कि आपल्या उद्योगांचा पाढा त्याच्या समोर सतत वाचत राहायचा मोह यांना आवरत नाही . एवढा एकच विषय चवी चवीने चघळण्याच्या नादात ते इतके मग्न होतात कि समोरचा कंटाळला असेल याचे भान अनेकदा सुटत जाते . किंवा इतर काही ज्येष्ठ सतत स्वकौतुकात रममाण असतात . आपले आजवरचे कर्तृत्व , आपण कमावलेले मान मरातब याची सतत समोरच्यापुढे उजळणी चालू असते .
असल्या छोट्या मोठ्या गमती त्यांच्या हातून अगदी अनावधानाने किंवा वयपरत्वे आलेल्या  असुरक्षिततेमुळे हि घडत असतील , अगदी मान्य आहे . उद्या आपण देखील असेच विनोदी वागणार आहोत हि देखील जाणीव आहेच , पण शेवटी त्यांचे निकटवर्तीय म्हणून लोकांपुढे त्यांचे हसे होत आहे हे आपल्याला बघवत नाही . आपला हेतू कितीही शुद्ध असला तरी बऱ्याचदा तो त्यांच्यापर्यंत पोचतच नाही , पोचला तरी कधी विपर्यास होऊन पोचतो आणि आपल्याच पदरी कटुता येते . त्यापेक्षा आपण निमूट गप्प राहणं पत्करतो . या बारीक सारीक गोष्टी सोडल्या तर यांची हि फेज कोणालाच फारशी त्रासदायक नसते.
त्रास होतो तो वेगळी च  मानसिकता बाळगणाऱ्या ज्येष्ठांचा.
 हि मंडळी अगदी मुळात नकारात्मक नसतीलही . पण आयुष्यातील पहिल्याच आलेल्या वादळाने हे लोक जे हेलकावतात ते त्यातून कधी उभारी घेतच नाहीत . आयुष्य सरळसोट नसतेच, त्यात चांगले वाईट दिवस असणारच हे सोपे गणित त्यांना सोडवायचे नसते . त्यांच्या कल्पनेपलीकडचं आयुष्य देखील त्यांच्या वाट्याला येऊ शकतं हेच त्यांना मान्य नसतं  . आणि काहीच मनासारखं घडत नाही या समजुतीला घट्ट चिकटून ते नकारात्मकता उराशी बाळगून जगत राहतात. इतकंच नाही तर या सर्व मनाविरुद्ध मिळालेल्या जगण्याचं खापर आयुष्यभर दुसऱ्यावर फोडत राहण्यात यांचं आयुष्य खर्ची पडतं . त्यासाठी स्वतः जबाबदारी घ्यावी आणि प्रयत्न करावेत हे काही त्यांना करायचं नसतं . किमान बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी  आपल्या माणसांना उभारी देणं सोडाच , त्यांना सतत टोचून बोलत राहणं , त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं इतकंच त्यांनी आयुष्यभर केलेलं असतं  .
हीच नकारात्मकता घेऊन जेव्हा ते वृद्धत्वात प्रवेश करतात , तेव्हा ना ते स्वतः सुखी होतात ना त्यांना संभाळणाऱ्यांना सुख देतात . म्हणूनच मग मुलं नातवंडांनी भरलेल्या घरात सुद्धा यांचे सदैव मूड गेलेले असतात . आपल्या रुटीन ची बारीकशी जरी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी यांना संकट कोसळल्यासारखं  वाटतं . कुठलाही विषय वळवून हे सतत स्वतःच्या केविलवाण्या (?) परिस्थितीकडे नेत  राहतात आणि उसासे टाकीत राहतात .
यांच्या  असल्या नैराश्याने भरलेल्या सान्निध्यात  एका मर्यादे नंतर यांना संभाळणाऱ्यांना मग फार काळ राहणं अशक्य होऊन जातं . त्यांचं सगळं कर्तव्यभावनेने करत असताना , त्यांच्या पाशी बसून कुठल्याही प्रकारे शेरिंग मात्र घरातले करू शकत नाहीत. हि खंत राहतेच मनात पण आपली मनस्थिती पॉसिटीव्ह राहण्याकरता अगदी नाईलाजाने घरातल्यांना त्यांच्या पासून अलिप्त राहावंच लागतं .
"मरे एक त्याचा , दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे "
 समर्थांच्या या श्लोका  प्रमाणे आपल्या वर देखील वयाचा असा आघात होणार आहे , आपण देखील आपल्या दुसऱ्या बालपणात नवनवीन गमती जमती करणार आहोत , याचे भान ठेऊन आत्तापासूनच आपल्या सवयी तपासात राहूया , किमान आपले दुसरे बालपण सावरताना आपल्या मुलांना सकारात्मक ऊर्जा आपण देऊ शकू इतके तरी स्वतःला आत्ताच बजावत राहूया .