Monday, February 26, 2018

valentine diaries

#valentinediaries


 हम भी कभी जवान थे .
 वयानुरूप दोन चार नजरा आपल्याकडे हि वळतायत याचे भान आले होते.
त्या नजरांना उलट नजरेने पोच द्यायची का दुर्लक्ष करून तिथंच थोपवायचं हे हि भान आलं होतं  .

म्हणजे , आजूबाजूला मैत्रिणींना धडादड प्रपोजल मिळत असत , काही फळत ,काही फसत .
पण आपल्याला साधं प्रपोजल देखील मिळू नये याचं मला कधी फारसं वाईट वाटल्याचं आठवत नाही .
कारण या वळणाऱ्या नजरांना तिथल्या तिथे जोखून , पोच देण्या इतका तरी खटाटोप करावा का , या फंदात पडावं का, हा सवालच आत कुठेतरी लगाम घालायचं काम करत असे .

स्वतःला असं अति धारेवर धरण्याचे फायदे होते तसेच तोटे देखील होते .
फायदे असे ,  कि केवळ आत हॉर्मोन्स धुडगूस घालतायत म्हणून कधी वहावत गेले नाही .
हव्या हव्याश्या वाटणाऱ्या प्रत्येक नजरेचे आवाहन कधी स्वीकारायचा मोह झाला नाही .
आत्ता बघू पाऊल पुढे टाकून , मग वाटलं तर घेतलं मागे , असं तर मुळीच झालं नाही .
ज्या रस्त्यावर जायचं नाही , त्याचा पत्ता कधी विचारलाच नाही .

हा फायदा आता अधिक प्रकर्षाने जाणवतो , जेव्हा अनेक प्रेम लग्नातील जोडपी खूप वर्ष लोटल्यावर " कुठे अक्कल गहाण टाकली होती त्या वेळी " अशा मानसिकतेत आढळतात . किंवा आधी पाऊल पुढे केलेली पण काही कारणाने फसलेली अशी मंडळी एकमेकांच्या समोर यायला देखील कचरतात .

तसंच या टोकाच्या सेल्फ कंट्रोल ची दुसरी बाजू आहेच .

हम  भी कभी जवान  थे . हमारे सीने में  भी दिल धडकता  था .
पण नुसतं दिल  में अरमान जागे होऊन भागत नाही हे त्यावेळी उमगत नव्हतं .
त्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जास्त हुशारी हि योग्य वेळी योग्य बकरा गटवता येणं यात  आहे , याची सुतराम कल्पना नव्हती . त्या वेळी यश चोप्रा ने दिलेल्या आश्वासनावर सारी भिस्त होती " कहीं ना कहीं , कोई ना कोई तुम्हारे लिये बना हैं"

आणि मग लक्षात आलं , लव मॅरेज चा थरारक प्रवास  काही आपल्यासाठी नाही .
ऍरेंज्ड मॅरेज च्या  नियोजित यात्रेचे आपण प्रवासी . या सो कॉल्ड नियोजित यात्रेचा सहप्रवासी कसा निपजेल हे शोधण्यातच मुळी कमालीचा थरार आहे .

प्रथम भेटल्यावरचे आम्ही,  आणि 21 वर्षानंतर चे आम्ही यात खूप फरक पडत गेला.
ॲरेंज्ड मॅरेज मधे एक दोन भेटींमधे खेळळेला जुगार हा पुढे आयुष्यभर खरं म्हणजे सांभाळून घ्यायचा असतो. तो सांभाळून घेताना आपली व्यक्ती म्हणून  प्रगती होते कि अधोगती हेच त्याच्या यशस्वीतेचं मोजमाप असतं.
आमचीही तीच अवस्था होती.  कोर्टशिप चालू असताना आमची भेट म्हणजे वेगवेगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठी भेटी . रोमॅन्स चा र काय असतो हे मला माहीत नाही , असं सुरवातीलाच #betterhalf ने डिक्लॅर केल्यामुळे परत कधी त्यावर चकार शब्द मी काढला नाही. मीही ही संधी साधून माझ्या कडून ज्या गोष्टी मुळीच होणं शक्य नाही त्या सांगून टाकल्या. तसंच आमचे अडनिड्या वयातले क्रश, ( आम्हा दोघांचीही मजल क्रश पर्यंतच ) एकमेकांना सांगून टाकले, त्यामुळे एक बरं झालं,  त्यानंतर एकमेकांच्या मित्र मैत्रिणींना खुलेपणाने भेटत राहता आलं,  सगळीकडे दोघांनी जायचा अट्टाहास कोणीच ठेवला नाही, कारण एकमेकांबद्दल कोणतीच शंका घ्यायला जागा नव्हती.

आज मी मोकळेपणाने माझं अवकाश शोधून माझ्या आवडीचे काम करते, तो देखिल  त्याचे सगळे छंद व्यवस्थित चालू ठेवतो. आपापली प्रगती साधताना सगळंच काही सरळसोट नव्हतं. इतक्या वर्षांत भरपूर वादविवाद झाले,  अगदी बॅग भरून चालू लाग पासून घटस्फ़ोट देऊन मोकळे होऊ इथपर्यंत.  पण एक पक्कं माहीत होतं,  कि आपण काही सर्व गुण संपन्न आणि परफेक्ट नाही,  मग समोरचा असेल असा आग्रह कधीच धरला नाही.  म्हणूनच माणूस आहे,  दोघेही चुकणारच, चुकले कि भांडणार, मग अबोला, मग राग शांत होणे मग एकाने ईगो बाजूला सारत साॅरी म्हणणे, दुसर्याने माफ करणे, हे सगळं आपसुक स्वीकारलं गेलं .

आता इतक्या वर्षांनी म्हणता येईल कि सहप्रवाशाची पुरेपूर ओळख पटली  आहे .
एकमेकां सोबत इतर सर्वांची काळजी घेत कौटुंबिक प्रवास करण्याचं गमक उमगलं आहे .
व्हॅलेंटाईन डे आजवर कधी आला कधी गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही .
ना कधी ऍनिव्हर्सरी मुद्दाम सेलिब्रेट केली .
गिफ्ट्स चं अप्रूप असतंच पण अट्टाहास दोघांनाही नव्हता .
पण एकमेकां साठी केलेल्या छोट्या मोठ्या कृतीतून , आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या पद्धतीतून कधीतरी एकमेकांचे व्हॅलेंटाईन होऊन गेलो खरे .