Saturday, March 7, 2020

KarmatNahi


तू सदैव जमवून घेतलंस , मी फक्त नवरेशाही गाजवली

आज 50 वर्ष होऊन गेली आपल्या संसाराला.
त्या वेळी एकच रिवाज. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा.
मीही तसाच वागलो.  तू माझ्या हो ला हो करत गेलीस.
सदैव माझ्या करता झटलीस,  माझ्या घराला घरपण आणलंस.
त्या वेळी या तुझ्या समर्पित वृत्ती ची कुठलीच दखल मी घेतली नाही.  तू असंच वागणं अपेक्षित होतं, त्यात काय मोठं,  उलट तू तशी वागली नसतीस तर मी ते मुळीच खपवून घेतलं नसतं.

आज एक एक प्रसंग आठवला तरी मला स्वतःची लाज वाटते.  तू तुझ्या माहेरी गेली होतीस. येणार होतीस त्याच्या एक दिवस उशीरा आलीस, मी स्टेशन वर तुला घ्यायला आलो होतो,  तू अप्पांबरोबर गाडीतून उतरल्या उतरल्या मी त्यांच्या समोर तुला फैलावर घेतलं. किती हिरमोड झाला असेल तुझा.
तुला सिनेमा बघायची भारी हौस. मला काही कामामुळे तुला नेणं  शक्य नसायचं, पण तू मैत्रिणींच्या बरोबर जावंस हेही मला कधी चाललं नाही.
तुझं असं विश्व कधी तू बनवू शकली नाहीस, मी आखून दिलेल्या पारिघात जमेल तसं वावरलीस कोणत्या ही  तक्रारीविना. पाहुणे रावळे सांभाळलेस , सासू ची सेवा केलीस तरी माझं कधी समाधान व्हायचं नाही.
मी मात्र आज हे उद्या ते करत करत घरगुती व्यापात तुला अडकवत राहिलो.

जेव्हा कुठेतरी जाणवायचं कि तू नाराज आहेस तेव्हा मी एकच करायचो, दागदागिने आण, साड्या घे, पण तुला हवा होता मायेचा शब्द पण मी समजून घेण्यास असमर्थ होतो. मला लोकसंग्रह करायची भारी हौस . पण घरच्यांना कसं आपलेपणाने बांधून ठेवावं हे मला कधी समजलंच नाही.

आता आज हे सगळं का बोलतोय मी असं तू म्हणत असशील , पश्चात बुद्धी दुसरं काय.....
आज लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करायला माझ्या सोबत तू नाहीस.......
आता हाती उरलंय फक्त तुझ्या अगणित फोटों कडे बघत राहणं.
आता हाती उरलंय फक्त तुझ्या पुतळ्याला हार घालणं.
माणूस आपल्या सोबत असतो त्या वेळी आपण किती गृहीत धरतो हे आता कळतंय.
नियतीने मारलेल्या या एका चपराकी ने मी भानावर आलो.

पण ........
करामत नाही.......घर घर वाटत नाही......