Friday, April 26, 2024

one sided posts

या ग्रूपवर फक्त वृद्धांबद्दल तक्रारी सांगणार्या पोस्ट्स लिहिल्या जातात असा आरोप आजवर अनेकांनी केला. कधी दुसर्यांच्या पोस्ट्स वरील कमेंट्स मधून, तर कधी स्वतंत्र पोस्ट्स लिहून हाच सूर आळवला गेला. 

वृद्धांवर सामुदायिक लेबल लावून तक्रारीच्या पोस्ट लिहिण्याचा हेतु असता तर त्याची परवानगी नाकारली गेली असती ही साधी गोष्ट आरोप करणारे विसरतात. इकडे मन मोकळं करण्याने सततच्या शारीरिक आणि मानसिक झगड्यातून क्षणिक उभारी मिळते इतकाच हेतू पोस्टकर्ते मनात बाळगतात. 

यातले प्रत्येकाचे अनुभव युनिक आहेत, त्यांचा सामना ते आपापल्या परीने करतच आहेत, सरसकट दूषणं देत बसण्या इतका वेळ आणि एनर्जी इथल्या कोणाच caregivers कडे नाही. त्यामुळे त्यांचं मनमोकळं कथन हे आपल्या ला उद्देशून आहे असा समज जर कोणाचा होत असेल तर तो त्यांनी काढून तरी टाकावा किंवा मग आपण घरी वागताना चुकत नाही ना याचं आत्मपरीक्षण तरी करावं. तुमच्याच कुटुंबातील caretakers ना त्याचा पुढे फायदा होईल. 

शिवाय इथे स्वतःचे caregivers म्हणून सकारात्मक अनुभव लिहायला कोणी बंदी केलेली नसताना, ते कमी किंवा अजिबात का शेअर केले जात नाहीत याची कारणं आक्षेप घेणार्यांनी जरूर शोधावीत. तसंच हा so called नकारात्मक पोस्ट्स चा trend मोडून काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण आपल्या ज्येष्ठांचं caregiving करताना अनुभवलेल्या सकारात्मक अनुभवांची भर घालावी. 

या आधी ग्रुप वर अशा प्रकारे सकारात्मक अनुभव लिहिले गेले आहेत व अशा पोस्ट्स चं इथे नेहमीच स्वागत झालं आहे कारण त्या आम्हा सर्वांना खूप च दिलासादायक वाटतात आणि अल्प काळ का होईना पण मनोबल उंचावतं. 

शेवटी इतकंच सांगेन कि सकारात्मक अनुभव जितके जास्त उलगडले जातील तितके नकारात्मक पोस्ट्स आपोआप कमी दिसू लागतील आणि तक्रारी ला जागाच उरणार नाही.

diabetes

Diabetes बद्दल एव्हाना आपल्याला व्यवस्थित awareness आला आहे तरीही काही वैयक्तिक अनुभव सांगून या माहितीची उजळणी करता येईल या हेतूने ही पोस्ट लिहित आहे. 

माझ्या सासर्यांना त्यांच्या वयाच्या 40 व्या वर्षी मधुमेह जडला. पण नियंत्रित आहार आणि अखंड व्यायाम आणि दर 3 महिन्यांत चेकिंग यामुळे जवळपास पुढची 30 वर्ष त्यांचा मधुमेह अगदी कंट्रोल मधे होता. त्यानंतर readings range बाहेर जायला सुरवात झाली. 
2018 साली एक दिवस त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं, मी चेक केलं तर bp low आलं, आणि admit केल्यावर doctors ना block सापडले आणि लगेच त्यांची angioplasty झाली. इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना घरी जाणवलेला अस्वस्थपणा हा silent heart attack च होता कारण diabetic patients ना attack चा chestpain जाणवत नाही. 

त्यापुढील 2 वर्ष सुरळीत गेली, मात्र एक दिवस पायाच्या जखमेचं निमित्त झालं आणि 2 महिन्यांत ते दुखणं gangrene पर्यंत गेलं. इथून पुढे 6 महिने त्यांनी आणि त्यांच्या 2 मुलांनी gangrene आणि uncontrolled diabetes शी निकराची झुंज दिली. सासर्यांनी शक्यतोवर स्वावलंबन सोडलं नाही, मुलांचा आधार घेत का होईना हालचाल उठून toilet पर्यंत जाणं सगळं चालू ठेवलं. दोन्ही मुलांनी आळीपाळीने डोळ्यात तेल घालून त्यांना जपलं. त्यांची sugar दिवसातून 3दा चेक करणं, कमी जास्त reading नुसार गोळ्या injection चे डोसेस ठरवून देणं, सासर्यांनी देखील शेवटपर्यंत धीर सोडला नाही. 

But sooner or later gangrene literally eats you up. इतकंच नाही तर शेवटपर्यंत नरकयातना काही सुटत नाहीत. High intensity painkillers आणि hospital मधे सलाईन मधून दिलेली painkiller injections काहीही त्यांच्या मरणप्राय यातना थांबवू शकले नाहीत. शेवटी पेशंट देखील हे सहन करून थकतो आणि त्याचाही धीर सुटायला लागतो. तसंच झालं, अगणित वेळा dressings, पायाची दोन बोटे कापली जाणे, पायाची angioplasty होऊन सुद्धा शवटी discharge च्या आधी एक दिवस सासर्यांना heart attack आला, ते comatose झाले, दुसर्या दिवशी icu मधे दुसरा attack आला आणि तासाभरात organ failure होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.

याला silent killer उगाच नाही म्हणत हे लक्षात आले. हे ही लक्षात घेण्याजोगं आहे की एका ठराविक वयापर्यंत आहार आणि विहार सांभाळून मधुमेह आटोक्यात राहू शकतो, पण वय वाढतं तसं हे ही होत नाही. त्यावेळेस मात्र सर्व प्रकारच्या जखमांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे.

elder care anubhav

#अनुभव 

काही व्यक्ती आयुष्यभर सामान्य मानव म्हणूनच जगू शकतात. त्या पलीकडे त्यांच्यात कोणत्याच भूमिकेत शिरण्याची कुवत नसते. आई/वडील, बहीण/भाऊ, नवरा/बायको, मुलगा/मुलगी, अगदी आजी/आजोबा सुद्धा. एकदा का यापैकी कोणत्याही नात्यात प्रवेश केला कि आपण स्वकेंद्रित सामान्य माणूस म्हणून जगूच शकत नाही. त्या भूमिकेचे आपल्याकडून काही ना काही मागणे असतेच. 

यातील कोणतीही व्यक्ति दुसर्‍याशी भूमिका सोडून सामान्य माणूस म्हणून वागली कि मने दुखावली जातात. दुखावलेली मने सावरायची असतील तर त्या भूमिकेबाहेर काढून गुण दोषांचे मिश्रण असलेली सामान्य व्यक्ति म्हणून बघावे लागते. हे करायचा वाढीव क्लिष्ट प्रयत्न दुखावलेल्या मनालाच करावा लागतो. तो एकदा जमला कि भूमिकेबाहेरील माणूस म्हणून त्याचे सगळे वागणेबोलणे त्रयस्थपणे स्वतःवर परिणाम होवू न देता बघता येतात. 

तरीही ज्येष्ठांचे पालकत्व निभावताना एखादा दिवस असा नाठाळ येतोच जो आपल्याला हे सगळे ज्ञान विसरायला लावतो, आपण पेशन्स ची परिसीमा ओलांडतो आणि बोलायला नको ते बोलून जातो. 
या सगळ्यात एक पक्कं ठाऊक असतं कि 'ती मला बोलली' ही इतकीच नोंद समोरचा घेणार असतो, आणि आपण बोललेलो आतवर शिरणारं तर नसतंच पुढच्याच क्षणी स्वतःच्या पुढील गरजेच्या पूर्ततेकडे वळतात, आत्मपरीक्षण वगैरे या गोष्टी त्यांच्यासाठी नसतातच. 

आपण मात्र नको ते बोलल्याबद्दल गिल्ट आणि त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भाव या कात्रीत अडकतो. 
या दोन्ही टोकांमधून स्वतःला वेळ देत, समजावत आपणच बाहेर काढावं लागतं, तर पुढचा पालकत्वाचा प्रवास अलिप्तपणे निभावून नेता येतो.

ads for helpers

काही पोस्ट ' आखूड शिंगी बहू दुधी' ही म्हण सार्थ ठरवत आहेत. 

मुळात कुणी ही आपले समजून दुसर्‍याच्या घरी उत्पन्नाचे साधन म्हणून राहून काम करील ही अपेक्षाच अवास्तव आहे. 
राहील, काम ही करील पण आपले समजून....? 

प्रत्येक मदतनीसाला आपलं घर आहे, संसार आहे, अडचणी आहेत, 
विनापाश व्यक्ति मिळणे, इतके सोपे असते? 
पूर्णपणे अनोळखी व्यक्तिवर आपण आपला पेशंट, घर, कागदपत्र, सामानसुमान सोडून निर्धास्त राहू शकतो? 
साधं केर, फरशी करणारी मदतनीस आपण कोणा ओळखीच्यांकडे काम करते हे पारखून कामावर घेतो, आणि पूर्ण वेळ घर ज्याच्या हवाली करणार अशी व्यक्ति फेसबुकवर शोधू शकतो?

घरातल्या व्यक्ति आपल्याच पेशंट ची दुखणी वर्षानुवर्ष काढून कंटाळून जातात, आणि परक्या व्यक्तिने दीर्घ काळ ते न कंटाळता करावे आणि अशी माणसे या ग्रुपवर जाहिरात करून मिळतील हा भाबडा (कि अति आगाऊ) समज आपण करून घेतो आहोत का? 

रीतसर bureau चा स्टाफ ठेवला तर निदान तो reliable असतो, background check होऊन आलेला असतो, खरंतर एका मर्यादेबाहेर ते ही कोणाची खात्री देऊ शकत नाहीत. 

आणि सेवाभाव आपल्याला तरी खरंच असतो का हो कि तो आपण परक्यामधे असण्याची अपेक्षा करावी? खरे सेवावृत्ती असणारे विरळाच, ते शिवधनुष्य पेलणारे त्याचे मोल पैशात करत नाहीत.

पोस्ट चा सूर हेटाळणीचा लागला आहे त्या बद्दल अगदी मनापासून माफी मागते, शेवटी अडला जीव सर्व प्रकारे विविध options शोधत असतो, मी ही त्यातून गेल्यामुळे अनुभव आहे, अजूनही घेते आहे, 

समोर हजर असेल मदतनीस तर मला सुट्टी नाहितर ते काम आपले, जसं घर आपलं, त्याची साफसफाई ही जबाबदारी आपली, आली तर मदतनीस करतेच पण तिने सुट्टी न घेता ते करतच रहावं ही अपेक्षा जशी अवास्तव तसंच पेशंट आपला, त्यांचं करणं हे आपलं काम, दुसरा कितीही मोल दिले तरी ते आपले समजून करेल याची आशा ही नाही आणि अपेक्षा ही नाही.

माझ्या करण्यात मला सेवाभाव नाही फक्त कर्तव्यपूर्ती दिसते तर बाहेरची सेवाभाव का म्हणून आणि कुठून आणेल? ती वरचेवर कंटाळून सुट्टीवर गेल्यावर मला तिचा राग येत नाही, तिला मी इतक्या सुट्ट्या का घेतेस विचारत नाही, मी गपगुमान माझ्या पेशंट च्या कामाला हजर राहते.

अगदी मान्य आहे, परदेशस्थ किंवा काम सोडून कुणाला हे जमणे अशक्य आहे आणि म्हणूनच ही अशी शोधाशोध करतात सगळं ठाऊक आहे, पण अशा वेळेस एक घर एक दोन जेष्ठ परक्याच्या हवाली करण्यापेक्षा तेवढ्याच मोबदल्यात वृद्धनिवासात व्यवस्था करणे जास्त योग्य वाटते.

response to a post

#मनोगत 
मागच्या काही दिवसांमध्ये ग्रुप वर दोन पोस्ट वाचनात आल्या त्यातील एक होती डॉक्टर देवधरांची फॅमिली डॉक्टर नी काय सल्ला द्यावा याबद्दलची आणि दुसरी होती केअरटेकर बाबतीतले विचित्र अनुभव.
 
या दोन्ही पोस्टच्या संदर्भात माझे काही मनोगत मला मांडावेसे वाटते.
 
डॉक्टर देवधरांच्या पोस्ट मध्ये आलेल्या कमेंट्स वाचल्यावर असे लक्षात आले की अनेकांचे असे मत आहे की प्रत्येकाला राईट टू दिग्निटी असावा. 
लोळा गोळा होऊन दुसऱ्यांच्या वर अवलंबून जगणं लांबवण्यापेक्षा तो टप्पा यायच्या आधी प्रत्येकाने लिविंग विल करून आपल्याला कोणत्या टप्प्यावर उपचार नाकारायचे आहेत याबद्दल अगोदरच निर्णय घेऊन ठेवण्याकडे अनेकांची मतं दिसली.
 
याबद्दल प्रकर्षाने जाणवलेला विचार असा कि हे शक्य आहे फक्त त्यांना ज्यांनी हल्लीच्या काळात लिविंग विल म्हणजे काय याबद्दल विस्तृत माहिती कुठे सोशल मीडियावर किंवा वाचून ऐकून मिळवली आहे आणि जे आत्ता कदाचित ज्येष्ठ नागरिकत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत म्हणजे साठ आणि त्याहून थोडेसे पुढे मागे आणि त्यांच्या पाठोपाठ चे असणारे पन्नाशी च्या टप्प्यावर असणारे आमच्यासारखे.
 
माझ्या घरातील नात्यातील परिचयातील काही अतिज्येष्ठ मंडळी 85 वय पार करून आयुष्याच्या अंतिम टप्पयावर महिना महिना आयसीयू मध्ये राहून तिथूनच पुढच्या प्रवासाला गेले आहेत. काही टोकाच्या पार्किंन्सस डिमेंशियामुळे देवधर डॉक्टरांच्या केस प्रमाणेच जन्म मृत्यूच्या सीमारेषेवर आहेत. 
काही दोन दोन वर्ष अंथरूणात होती पण भानावर होती, काहींना आपण कुठे आहोत त्याचेही भान नाही, यातले काहींना अगदी शेवटच्या काही दिवसांमधे अन्न पाणी सोडून कंटाळून गेल्यावर मृत्यूचे वरदान मिळाले.
  
काही ज्येष्ठ असेही आहेत जे व्यवस्थित भानावर आहेत ते अनेक वर्ष परावलंबी जीवन देखील थाटामाटात जगत आहेत. केअर टेकर ना आपल्या इशाऱ्यावर नाचवत घरा दारावर हक्क गाजवत आहेत, त्यांना कुठेही अशा प्रकारच्या जगण्याचा कंटाळा आलेला नाही. 

अशा अतिज्येष्ठ व्यक्तींना लिविंग विल म्हणजे काय हे अजिबात माहित नाही. ते सोशल मीडियावर नाहीत त्याबद्दल त्यांच्या वाचनात कुठे आलेले नाही ऐकिवात आलेले नाही व पुसटसे कुठे वाचलं ऐकलं असेल पण त्याबाबत खोलवर जाऊन त्याची माहिती काढण्याचा त्यांच्यापैकी कोणीही प्रयत्न केलेला नाही.  

बाहेरून जर कोणी त्यांना किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांना याबाबत माहिती पुरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यातून निराळाच अर्थ बोध ही अतिज्येष्ठ मंडळी घेऊ शकतात आणि घेतात असे आढळले आहे. 
तू मला असं असं वाचून दाखवलं याचा अर्थ तुला मी ते करायला हवं आहे याचा अर्थ तू मला तसं करण्याबद्दल सुचवू पाहत होतीस असे अर्थ निघालेले आहेत त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याच्या भया पोटी तो विषय तिथेच थांबवणे श्रेयस कर ठरते. 
 
केअरटेकरच्या अनुभवाबद्दल लिहू तितकं कमीच आहे. मागे मी एकदा त्यावर एक लेख लिहिला होता. आपल्या ग्रुप वर अनेक वेळा केरटेकर हवेत याबद्दल जाहिराती येत असतात. त्या येण्याबद्दल काही आक्षेप नसतोच पण त्या ज्या प्रकारे आखूडशिंगी बहु दुधी टाईप अपेक्षा असतात त्यावर मी तो लेख लिहिलेला होता. 
 
ग्रुप वर आत्ताच आलेल्या केअरटेकर च्या अनुभवाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ब्युरो काय किंवा हे केअरटेकर मदतनीस काय आपल्या एका असमर्थतेचा व्यवस्थित फायदा उठवत असतात. ती असमर्थता म्हणजे आपल्या पेशंटची सतत 24 तास उठ बस करणं, बडदास्त ठेवणं न जमणं. 
 
ही असमर्थता विविध कारणांमुळे आलेली असते. नोकरी व्यवसायानिमित्त कुटुंबीयांनी दिवस दिवस घराबाहेर असणं. घरात असतील तरीही इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पेशंटला सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि हातात देणे खरोखर अशक्य होऊन बसते. 
 कधी त्या पेशंटशी आपले इक्वेशन हे सुरुवातीपासूनच बिनसलेले असते त्यात त्याला परावलंबित्व आल्यावर कधी त्यालाही आपल्याकडून करून घ्यायला संकोच वाटत असतो कधी आपलेही मन आणि शरीर अशा अशावेळी असहकार पुकारते. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापैकी कारण कोणतेही असो दिवसाला पाचशे ते सातशे आठशे हा रेट देऊन महिन्याचे पंधरा-वीस हजार त्या पेशंट वर खर्च करण्याची तुमची तयारी असते म्हणून आपण त्या वाटेला जातो. 
 आता गरज तिथे पुरवठा या न्यायाने आपली असमर्थता कुणाचे तरी उपजीविकेचे साधन हे होणारच.  
हा साधा पैशाचा व्यवहार आहे, दहा ते बारा तासांसाठी आपण त्या मदतनीसाचा वेळ आणि श्रम भाड्याने घेत आहोत. तिथे जर सेवा भाव शोधायला गेलो तर ती आपली सगळ्यात मोठी चूक ठरते.  
मी माझ्या लेखात मागे म्हटल्याप्रमाणे पेशंटशी आपले नाते जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर आपल्यामध्ये देखील सेवाभाव क्वचितच आढळतो.  

अनेकांनी कमेंट्स मध्ये म्हटल्याप्रमाणे दिलेल्या पैशाचे भान मदतनीसाला असावे का तर हो नक्कीच असावे. पहिल्या दिवशीच त्याला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांची व्यवस्थित माहिती देता आली तर उत्तम. पहिलाच दिवस आहे जाऊ दे होईल हळूहळू सवय याचा बऱ्याचदा गैरफायदा घेतला जातो. 
 
ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अजिबातच चालढकल केलेली किंवा कमी जास्त केलेले चालणार नाही पेशंटच्या दृष्टीने ते योग्य ठरणार नाही त्या गोष्टींचा खुलासा पहिल्या दिवशीच करायला हवा. 

पेशंटकडे घरातील इतर कामवाल्या बायकांची चौकशी करू नये, घरातल्या इतर माणसांबद्दल त्यांच्या कामधंद्याबद्दल त्यांच्या मुलाबाळांबद्दल चौकशी करू नये, हे बेसिक नियम पहिल्याच दिवशी क्लिअर करावेत.
पेशंट ने देखील घरातील कोणत्याही खाजगी बाबी केअरटेकर मदतनिसाकडे बोलून दाखवू नयेत.
पेशंटच्या आणि तुमच्या नात्यांमध्ये कितीही दरी असेल तरी ती दरी कधी मदतनिसांसमोर उघड होणार नाहीत याची खबरदारी आपणच घ्यायला हवी.  
दहा-बारा तास आपल्या घरात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मदतनिसांना नात्यांमधले पॉलिटिक्स समजायला तसाही वेळ लागत नाही.  
तसा आपलाही पेशंट आपल्याला व्यवस्थित माहित असतो. मूळ स्वभाव त्यात वयापरत्वे आणि आजारपणामुळे त्यात झालेली भर यामध्ये मदतनीसाचे माणूस पण जपणे ही या सगळ्या कसरती मधली अत्यंत कठीण गोष्ट आहे.

helper questionnaire

मदतनीस किंवा ब्युरो ही सेवा घेण्याआधी काही प्रश्नावली किंवा चाचणी यादी तयार करता येईल का याबाबत एक पोस्ट वाचनात आली.
 माझ्या अनुभवानुसार ती यादी किंवा मुद्दे मी या पोस्टमध्ये मांडते. 
प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार त्यात भर घालावी किंवा बदल करावेत.

मदतनीसांकडून अपेक्षे बाबत मुद्दे: 

1) पेशंट  स्वतःचे काय  आणि किती करू शकतो याची माहिती देणे

 2) पेशंट  कोणत्या गोष्टी स्वतः करू शकत नाही

 3) पेशंटला डॉक्टरांनी   कोणती ऍक्टिव्हिटी आवर्जून करायला सांगितली आहे
 
4) पेशंटला डॉक्टरांनी काय करायला मनाई केलेली आहे  

5) मदतनीसानी पेशंटची करायची कामे 

6) मदतनिसांनी घरातल्या कामांमधली पेशंटशी निगडित करायची कामे 

7) कामावर येण्याची वेळ, कामावरून सुटण्याची वेळ परस्पर संमतीने ठरवणे 

8) मदतनिसाने पेशंट कडे खालील चौकशा करू नयेत :
घर, त्यातील माणसे, त्यांची कामे, त्यांची मुले बाळे 

9) मदतनीसाने पेशंटची बोलायची इच्छा आहे किंवा नाही हे बघून मग पुढील संभाषण वाढवायचे की नाही हे ठरवावे 

10) मदतनिसाला जर फोन आला तर पेशंटचे काम चालू असताना तो घेणे टाळावे

11)  पेशंटचे काम चालू नसताना जर फोन आला तर पेशंटची पूर्व परवानगी घेणे आणि बोलण्यासाठी पाच दहा मिनिटांची रजा घेणे
 
12) मदतनीसाला जर फोन करायचा असेल तर पेशंटची  कामाची वेळ नाही अशी वेळ बघून पेशंटची पूर्वपरवानगी घेऊन किती मिनिटे बोलू शकते याचा अंदाज घेऊन पंधरा मिनिटांची सुट्टी घेणे 

13) पेशंटला हवे असेल तेव्हाच टीव्ही, रेडिओ किंवा इतर करमणुकीची साधने सुरू केली जातील अन्यथा इतर वेळी ती बंद राहतील त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी भुणभण करू नये 

14) घरातील इतर कामगार वर्ग किंवा मदतनीस यांच्या वाट्याला जाऊ नये 
ते करत असलेल्या कामांचा क्वालिटी कंट्रोल करायला जाऊ नये  
त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी कटकट करू नये 
तिने अमुक अमुक केलंच नाही, तिने आज हे झाडलंच नाही 
ही भांडी बघा अशीच राहिली आहेत यातले काहीही पेशंटला किंवा घरातल्यांना सांगायला येऊ नये
 घरातल्या कामवाल्या बाईच्या हलगर्जीपणाचा बोजा तुमच्यावर पडतोय असे वाटत असेल  तर कामवाल्या बाईशी डायरेक्टली डील करायला सांगावे.

पेशंट आणि परिवाराने पाळायच्या काही गोष्टी: 

1) मदतनीस माणूस आहे त्याला माणसाच्या गरजा आहेत.

 2) योग्य वेळी जेवणाची सुट्टी, त्यानंतर पेशंट ची वेळ सांभाळून पंधरा-वीस मिनिटे विश्रांती, अधेमधे दिवसातून एखादा आलेला फोन, एक दोन केलेले फोन हे मान्य असायला हवे.  

3) आपल्या पेशंटच्या स्वभावाचे आपल्याला व्यवस्थित भान हवे, त्याबाबत स्वीकृती हवी
 दरवेळी मदतनीसच चुकीचे असतील आपला पेशंटही चुकू शकतो ही शक्यता गृहीत धरायला हवी आणि त्यानुसारच मदतनीसाला किंवा पेशंटला दोघांनाही सौम्य प्रकारे समजावणे ही घरातल्यांची जबाबदारी असायला हवी. 

4) मदतनीसाला घरातली जादा कामे सांगताना ती फक्त आणि फक्त पेशंटशी निगडित असतील, त्याच्या स्वच्छतेच्या प्राथमिक गरजेच्या संबंधित असतील इतपतच सांगावी बाकी कोणासाठीही घरकाम करायला मदतनीस बांधील नाही हे पक्के लक्षात ठेवावे. 

5) मदतनीसाला ही सणवार आहेत, घरदार आहे, सणावारी त्यालाही सुट्टी लागणार, ती आनंदाने द्यावी सणवार असल्यामुळे त्यावेळी बदली मदतनीस मिळणार नाही याची पुरेपूर तयारी ठेवावी.

Wednesday, May 6, 2020

Forever host

परदेशात राहणारे आप्त या जमाती चे मला प्रचंड कौतुक आहे. कौतुक अश्याकरता नाही कि ते आपल्यापेक्षा संपन्न, स्वच्छ आणि सुलभ देशात राहतात, याचं कि तिकडे स्थायिक झाल्यामुळे त्यांना कायमचे " यजमानपद" किंवा " forever host " हे बिरूद चिकटलेले  असते. वरवर गोंडस भासणारे पण कायमचे झाल्यावर कटकटी चे  असे हे बिरूद. 
#ForeverHost


आपण परदेशात टूरिस्ट म्हणून जायचं ठरवताना सगळ्यात पहिले काय बघतो, " अरे अमुक अमुक या स्टेट मध्ये आहे, बर झालं" , " तिकडे तमुक तमुक आहे , काळजीच नको," हो कि नाही ? या बिचार्या फोरेवर होस्ट ना कायमच  उचक्या लागत असतील इतके  आपण भारतीय त्यांच्या कडे जायच्या प्लान्स ने त्यांच्या आठवणी काढत असतो. खासकरून मे महिना, दिवाळी, या टिपिकल भारतीय सुट्ट्या आल्या कि तर हमखास.

 नाताळच्या सुट्टीत तीच मंडळी इकडे येतात त्यामुळे तेवढीच काय ती त्यांना सूट. नाही तर कोणी न कोणी भारतीय कनेक्शन यांना कायमच गृहीत धरत असावं. अगदी सासूच्या मैत्रिणीच्या बहिणी पासून ते मेव्हण्याच्या भाचीच्या मैत्रिणी पर्यंत कोणीही यांना आपल्या येण्याची वार्ता कळवत असत. अगदी तंबू ठोकून राहायला येण्यापासून ते एक दिवसाचा स्टोप ओवर असो किंवा नुसती सौजन्य भेट असो या फोरेवर होस्ट ना कायमच एक प्रकारे डोक्यावर टांगती तलवार असेल. बर, ओळख वरवरची असो , त्यांचे काही प्रोग्राम्स  ठरलेले असो , त्यांना एखादा वीकेंड काहीही न करता नुसते लोळायचे असो, परदेशात स्थायिक आहेत म्हटल्यावर, त्यांनी भारतीय टूररिस्ट ना  अटेंड करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्यासारखी अपेक्षा आपण ठेवतो. 

एकदा पाहुणे आलेत म्हटल्यावर कोणत्या गोष्टी चुकत नाहीत ? आणि पहिल्यांदाच आलेत म्हटल्यावर तर अत्यंत प्रेमाने काही गोष्टी नव्हे लाड जी  हि मंडळी करतात त्याला तोड नाही. मुळात मनात जागा म्हणून घरात जागा करणे, एरपोर्ट पिकप, स्पेशल मेन्यू प्लानिंग, साईट सीइंग शेड्युल बनवून देणे, तेथील कल्चर, पदार्थ, खरेदी  सकट सगळ्या खासियातींचा आपल्याला आस्वाद घेता यावा म्हणून धडपडणे, आपल्या व्यस्त शेड्युल मधून आपल्याकरता वेळ काढणे, मुलांच्या विविध उपक्रमांमधून आपलं हवं नको बघणे. 

बर, येणारे काही आपण एकमेव नसतो. आपल्या आधी अनेकजण पाहुणचार घेऊन गेलेली असतात, नंतर हि ओघ सुरु राहणारच असतो. अगदी आपणच काही लाडके नसतो, इतरही त्यांचीच जोडलेली जीवाभावाची माणसे असतात तरी देखील हे बिरूद मिरवत आपली घरे, मने, वेळ, आपल्यासाठी सदैव खुली ठेवणारी हि मंडळी असतात. अगदी यांच्या आणि आपल्या  आधीच्या दोन पिढ्यांनी देखील शहरात घरे केल्यावर गावाकडच्या पाहुण्यांचं आगत स्वागत करण्यातच हयात घालवलेली असते सगळं सगळं काबुल असलं तरी म्हणून याचं योगदान किंचितही फिकं पडत नाही. उलट भयंकर तारेवरची कसरत आहे हि. या सर्वांबद्दल एकच भावना " तेथे कर माझे जुळती " 

माझ्या आजवरच्या उण्या पुर्या दोन परदेशवार्या ज्यांच्या जीवावर, घरावर, पाहुणचारावर पार पडल्या अश्या याच जमातीतील काही जिवलगांना tag करतेय. 
- मीनल