Friday, April 27, 2018

Introspection

#introspectionanyone#

निकालाचा दिवस . नवीन भाषा थर्ड लँग्वेज म्हणून कुठली मिळाली हि सर्वांना उत्सुकता .
कुणाला जर्मन कुणाला संस्कृत कुणाला मराठी इत्यादी चर्चा रंगल्या . लगोलग शाळेच्या ग्रुप वर जर्मन क्लासेस  च्या जाहिराती आदळायला लागल्या .नवीन विषयाचा क्लास लावून पालक आता मोकळे होतील .
 छान मार्क म्हणजे उत्तम क्लास . कमी मार्क म्हणजे भंगार टीचर .
 त्याचे  फंडे 'क्लिअर 'आहेत .
 एका ओळखीच्यांनी मुलाला कमी मार्क मिळाल्याचे खापर ट्युशन टीचर वर फोडले . का तर इतके पैसे भरून पदरात मार्क नाहीत म्हणजे काय ? अमुक एका क्लास च्या टीचर मार्कांची हमी देतात . चला धावा  तिकडे .
शाळाबाह्य उपक्रमांचे देखील तेच . एखाद्या खेळात किंवा कलेत आपले मूल प्रवीण असणे किंवा नसणे याला देखील बऱ्याचदा शिक्षक अथवा कोच लाच जबाबदार धरले जाते .
या सगळ्यात सोयीस्कर पणे विसरले जाते ते आत्मपरीक्षण . पालक म्हणून स्वतःचे आणि आपल्या पाल्याचे  .
सर्वात ढोबळ मानाने लावला जाणारा निकष म्हणजे आपल्यासारखेच आपले मूल  एखाद्या उपक्रमात निपजणे हा आग्रह . आपल्याला अनुकूल असे आपले गूण मुलात उतरले आहेत का नाही हे तपासून घ्यायला थोडा अवधी तरी हवा .
बरं आवड आहे , इच्छा आहे अमुक उपक्रम करण्याची तर अनुभव म्हणून करून पाहूदे , मजा घेउदे , जमल्यास नवीन शिकता येउदे . इतकी बेसिक उद्दिष्ट साध्य झाली तरी खूप झालं . पण छे , आपल्याला सगळ्यात अचिव्हर्स च हवेत . मार्कांची तर आहेच , ती कमी म्हणून आता उपक्रमां मध्ये देखील स्पर्धा चुरस हवीच . आपण हि उतरतो आणि मुलांना देखील उतरवतो . बरं अपेक्षित रिझल्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमांची तरी मुलांची मानसिकता आहे का ? आपली तर आहेच हो . पालक म्हणून आपली ध्येय तर आकाशालाच पोचली आहेत . पण मुलांचं काय ? आपण चारी ठाव खुराक देऊ , पोषक वातावरण देऊ , ने आण करू , थोडक्यात घोड्याला पाण्यापाशी नेऊ ....... ...... पण पाणी प्यायचं का नाही हे आपण नाही ना ठरवू शकत .

आपले मूल अभ्यासात सिन्सिअर नसेल , शाळेत ट्युशन ला टिवल्याबावल्या करत असेल , खेळाचा वर्कआउट मस्ती करत कोच ची बोलणी खात उरकत असेल , कलेत एकाग्र होत नसेल , कुठलीच स्वयंशिस्त ना पाळता जुलमाचा रामराम ठोकत असेल , उलट  या पैकी कुठलीच हयगय आपण मुळीच करत नाही , हे वर भासवत असेल आणि वरील कुठलीही शक्यता नाकारून  आपण डोळे झाकून मुलांचंच खरं मानून त्यांच्या कामगिरी चं खापर शिक्षक , कोच वरच फोडणार असू , तर आपण स्वतःलाच फसवत आहोत , नाही का ?
नुसतं क्लास बदलून , कोच बदलून मार्क , मेडल्स अथवा कुठलच प्राविण्य पदरात पडत नाही , हे आपल्याला कधी कळणार . बऱ्याचदा अंगभूत कौशल्य बाहेर व्यक्त व्हायला ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो , या मधल्या काळात बरेचदा मुलांना आपोआप समज येते , शहाणपण येतं , वय मोठं होतं तसं शारीरिक मानसिक बळ देखील आपसूक वाढतं .
आणि अचानक एक दिवस आपल्याला अपेक्षित ते 'यश 'लक्खपणे समोर येऊन ठाकतं . पण त्यासाठी थोडं थांबायची , वाट पाहायची , योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते . एखाद्या तळमळीच्या शिक्षिका कडे आपल्या उतावीळपणामुळे हकनाक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे .
या वर्षीच्या निकालातून आपण या गोष्टीची  थोडीफार  जाण ठेऊन वागू शकतोय का ते पाहूया . 

Thursday, March 22, 2018

Lingering faces

#lingering faces


कामावर जाणारी आई नेहमी धास्तावलेली असते .
कितीही चोख व्यवस्था केली , तरी तिच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेची धाकधूक असतेच .

 हि धाकधूक कुठल्याही स्तरातील आई ला चुकत नाही , याचा एक हृद्य प्रत्यय नुकताच आला .

स्थळ होतं मुंबईतील एक अद्ययावत बँक्वेट  हॉल . निमित्त होतं तिथे पार पडलेलं एक कौटुंबिक लग्न कार्य .
दोन दिवस त्या कार्याकरिता लग्नघराकडून  बुकिंग झालं होतं .

हॉल च्या लेडीज वॉशरूम मध्ये २ संध्याकाळी मला विलक्षण दृश्य पाहायला मिळालं .
वॉशरूम ची एकमेव लेडीज अटेंडंट आपल्या ७/८ वर्ष्यांच्या मुलाला बरोबर घेऊन ड्युटी वर येत असे आणि वॉशरूम अटेंड करत असे . तिची ड्युटी बहुदा २ऱ्या शिफ्ट मध्ये असावी . पूर्ण संध्याकाळ ती व तिचा लेक वॉशरूम मध्ये बसून असत .

एरवी आपल्या डोळ्यांना लेडीज अटेंडंट ची उपथिती बोचा यचं काही कारण च नाही . किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं . वॉशरूम ची चकचकीत स्वच्छता त्यांच्या उपस्थितीने अधोरेखित च होत असते .

 पण या वेळी हे माय लेक पाहून आत कुठेतरी चर्र होत होतं .

पूर्ण २ संध्याकाळ जवळपास ६ ते रात्री १० आमचा त्या हॉल मध्ये वावर होता . अधून मधून  २/३ दा  तरी त्या वॉशरूम मध्ये चक्कर टाकायला लागत होती .
 दर वेळी आत गेल्यावर ते छोटुकलं लुकलुकत्या नजरेनं आल्या गेल्या कडे बघत बसे . तोच त्याचा विरंगुळा . वॉशबेसिन च्या लांबलचक कठड्यावरच्या एका कोपऱ्यात शांत  बसून त्याचं  निरीक्षण चालू असे .
ते त्याचं शांत बसणं ,..... ......
 दार ढकलून कुणी आत आलं ,
 कि नवं खेळणं मिळाल्यागत त्याच्या चेहऱ्यावरची रेष बदलणं ... ..... .
 आतल्या आत कालवाकालव करून जात असे .

एका खेपेला माझा आई ला वॉशरूम मध्ये सोबत करायला गेले . त्या वेळी आईने तिची कवळी तोंडातून काढली ,  बेसिन मध्ये नळाखाली धुतली व परत तोंडात बसवली .
अशी विलक्षण गम्मत त्या छोट्याने बहुदा पहिल्यांदाच पहिली असणार . अतिशय आश्चर्याने त्याने आपल्या आईशी त्या बाबतीत केलेले हितगुज पाहून आम्ही त्याला हसून पोच दिली . त्यावर भयंकर कॉन्शस होऊन अशक्य लाजला तो छोटू .

अश्या कित्येक संध्याकाळी ते पोरगं आईच्या ड्युटी च्या या जागेवर घालवत असेल . त्याच्या कित्येक बालसुलभ क्रिया संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळण्या बागडण्या ऐवजी या बंदिस्त जागेत विरून जात असतील .

निम्न स्तरातील असून देखील त्याच्या सजग आईच्या दक्षतेचं कौतुक करावं कि तिच्या हतबलतेची कीव करावी हे मात्र न सुटलेलं कोडं आहे .

Wednesday, February 28, 2018

bhashaprem

#Iloveboth

काल मराठी भाषा दिवस 'साजरा 'झाला . म्हणजे नक्की काय झालं ?
निवडक ठिकाणी चर्चासत्र , करमणुकीचे कार्यक्रम सादर झाले , कुठे मराठी अभिमान गीत गायले  गेले , न्यूज चॅनल वर वाद विवाद रंगले इत्यादी इत्यादी .

सोशल मीडिया तर हल्ली कोणी शिंकलं तरी दखल घेतो .हा तर सोनियाचा दिन .  तिथे काय सीन होता ?
ओढून ताणून घडवून आणलेला तोच तो घिसा पिटा 'इंग्रजी विरुद्ध मराठी ' सामना . इंग्रजी कशी वाईट , इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं कशी बिचारी , त्यांचे पालक किती मूर्ख . ज्या गोष्टी , ज्या कलाकृती इतकंच काय जी लोकं , ज्याला ज्याला म्हणून इंग्रजी चा स्पर्श झाला असेल त्या सर्वांवर यथेच्छ ताशेरे ओढले कि झाला यांचा मराठी भाषा दिन साजरा .

दुसऱ्याला कार्ट ठरवल्यावरच आपला तो बाब्या ठरतो का ?
इंग्रजी ला नावं ठेवल्यावरच तुमचं मराठी प्रेम सिद्ध होतं का ?
त्रास होतो या वृत्ती चा . हे डावं उजवं करण्याचा .
मुलाला विचारलं कि आई जास्त आवडते कि बाबा तर तो गडबडून जातो , माझं हि काहीसं तसंच होतं .
जितकं प्रेम मी मराठी वर करते तितकाच त्रास कुणी इंग्रजी ला नावं ठेवली तर मला होतो .

माझं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं . त्याच्या जोडीला घरातलं वातावरण अस्सल मातृभाषिक होतं .
माझ्या बाबांचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर सारखंच प्रेम आणि प्रभुत्व . त्यांनी माझा इंग्रजी व्याकरणाचा बेस पक्का केला . त्याच बरोबर मला मराठी वाचायची देखील गोडी लागली . पुलं च्या कॅसेट्स पुस्तकं वाचत ऐकत , जुनी भावगीतं भक्तिगीतं सिनेगीतं ऐकत मोठी झाले . गदिमा , बाबूजी , आशा , लता , रफी , मुकेश , तलत ही दैवतं व गीतरामायण हे धार्मिक ग्रंथ हे संस्कार झाले . तितकाच आनंद सिक्रेट सेव्हन , फेमस फाईव्ह , नॅन्सी ड्रु , शेरलॉक होम्स यांनी दिला . पुढे पी जी वूडहाऊस नि humor आणि wit च्या प्रेमात पाडलं .

आमचं मुंबईतील वास्तव्य मुलुंड ठाणे पार्ले आणि बांद्रा अश्या अनेक ठिकाणी झालं . त्यात मुलूंड ठाणं एकसारखं पण पार्ल्याची संस्कृती वेगळी , बांद्रा ची अजूनच वेगळी . कॉस्मोपॉलिटन कल्चर शी उंबऱ्या आतून का होईना पण परिचय झालाच . सासर पुण्यात नवी पेठेत . तिथली अस्सल पुणेरी संस्कृती . सर्व प्रकारचं एक्सपोजर मिळाल्यामुळे हेच चांगलं , तेच वाईट , आमची तेवढी अस्मिता , दुसरा कस्पटासमान हि वृत्ती कधी शिवली नाही .
माझे शाळासोबती पार्ल्या सारख्या संपन्न उपनगरातील . आज ते जगभर विखुरले आहेत . त्यांच्या कक्षा रुंदावल्या . मराठी शी त्यांचा संबंध दुरावला .  अनेकांचे जोडीदार वेगळ्या मातृभाषेचे . त्यांना भेटल्यावर मी बरेचदा एक अक्षर देखील मराठी बोलत नाही किंवा आमचं संभाषण इंग्रजी मिश्रित मराठीत होतं  . पण मला त्याने काही फरक पडत नाही . त्यांना देखील माझ्या मराठी शी जोडलेल्या नाळेचं , माझ्या मराठी लिखाणाचं कौतूक आहे . ते माझ्या मराठी प्रेमाला कधी कमी लेखत नाहीत .

मराठी चॅनल वरचे 'नक्षत्रांचे देणे 'किंवा पूर्वीच 'सारेगम 'कार्यक्रम मी तन्मयतेने पाहिले आहेत . तितकीच तन्मयतेची अनुभूती मला मुलांना जर्मन किंवा इंग्रजी ग्रामर शिकवताना येते . मराठी शाळेतील मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवताना खरं समाधान मिळतं . तितकंच झपाटलेपण संगीत कार्यक्रमांचं मराठीतून निवेदन लिहिताना येतं . सुदैवाने एक धरलं आणि दुसरं सुटलं असा माझं झालं नाही .

अशुद्ध मराठी बोललं किंवा लिहिलं कि जे खटकतं तेच चुकीचं इंग्लिश लिहिलं बोललं कि वाटतं . चुकीची दुरुस्ती करून द्यायला हात आणि तोंड शिवशिवतात . पण स्वतःला यावर घालावा लागतो कारण माणसं तोडायची नसतात . बऱ्याचदा एखादी व्यक्ती इंग्रजी बोलते म्हटल्यावर काहींच्या चेहऱ्यावर तिडीक उमटते , त्याला/तीला वेगळ्या नजरेने पाहिलं जातं , संस्कृती बाह्य म्हणून हिणवलं जातं  .

अश्या लोकांनी जरा स्वतःपुढे आरसा धरावा , आपण एका सो कॉल्ड परकीय भाषेच्या सुंदर अनुभवाला मुकलो आहोत हे मान्य करावं . त्याही पुढे जाऊन जमल्यास त्या भाषेशी दोस्ती चा हात पुढे करावा .

शेवटी एकंच नमूद करावंसं वाटतं .
साहित्य संगीत कला यांचे आविष्कार भाषातीत आहेत . त्यांना खुलेपणाने स्वीकारुया . जगभरात ज्ञानेश्वर अवतरले आहेत . त्या सर्वांपुढे कर जोडूया , नतमस्तक होऊया.
देणाऱ्याचे हात हजारो..... दुबळी माझी झोळी .



Monday, February 26, 2018

valentine diaries

#valentinediaries


 हम भी कभी जवान थे .
 वयानुरूप दोन चार नजरा आपल्याकडे हि वळतायत याचे भान आले होते.
त्या नजरांना उलट नजरेने पोच द्यायची का दुर्लक्ष करून तिथंच थोपवायचं हे हि भान आलं होतं  .

म्हणजे , आजूबाजूला मैत्रिणींना धडादड प्रपोजल मिळत असत , काही फळत ,काही फसत .
पण आपल्याला साधं प्रपोजल देखील मिळू नये याचं मला कधी फारसं वाईट वाटल्याचं आठवत नाही .
कारण या वळणाऱ्या नजरांना तिथल्या तिथे जोखून , पोच देण्या इतका तरी खटाटोप करावा का , या फंदात पडावं का, हा सवालच आत कुठेतरी लगाम घालायचं काम करत असे .

स्वतःला असं अति धारेवर धरण्याचे फायदे होते तसेच तोटे देखील होते .
फायदे असे ,  कि केवळ आत हॉर्मोन्स धुडगूस घालतायत म्हणून कधी वहावत गेले नाही .
हव्या हव्याश्या वाटणाऱ्या प्रत्येक नजरेचे आवाहन कधी स्वीकारायचा मोह झाला नाही .
आत्ता बघू पाऊल पुढे टाकून , मग वाटलं तर घेतलं मागे , असं तर मुळीच झालं नाही .
ज्या रस्त्यावर जायचं नाही , त्याचा पत्ता कधी विचारलाच नाही .

हा फायदा आता अधिक प्रकर्षाने जाणवतो , जेव्हा अनेक प्रेम लग्नातील जोडपी खूप वर्ष लोटल्यावर " कुठे अक्कल गहाण टाकली होती त्या वेळी " अशा मानसिकतेत आढळतात . किंवा आधी पाऊल पुढे केलेली पण काही कारणाने फसलेली अशी मंडळी एकमेकांच्या समोर यायला देखील कचरतात .

तसंच या टोकाच्या सेल्फ कंट्रोल ची दुसरी बाजू आहेच .

हम  भी कभी जवान  थे . हमारे सीने में  भी दिल धडकता  था .
पण नुसतं दिल  में अरमान जागे होऊन भागत नाही हे त्यावेळी उमगत नव्हतं .
त्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जास्त हुशारी हि योग्य वेळी योग्य बकरा गटवता येणं यात  आहे , याची सुतराम कल्पना नव्हती . त्या वेळी यश चोप्रा ने दिलेल्या आश्वासनावर सारी भिस्त होती " कहीं ना कहीं , कोई ना कोई तुम्हारे लिये बना हैं"

आणि मग लक्षात आलं , लव मॅरेज चा थरारक प्रवास  काही आपल्यासाठी नाही .
ऍरेंज्ड मॅरेज च्या  नियोजित यात्रेचे आपण प्रवासी . या सो कॉल्ड नियोजित यात्रेचा सहप्रवासी कसा निपजेल हे शोधण्यातच मुळी कमालीचा थरार आहे .

प्रथम भेटल्यावरचे आम्ही,  आणि 21 वर्षानंतर चे आम्ही यात खूप फरक पडत गेला.
ॲरेंज्ड मॅरेज मधे एक दोन भेटींमधे खेळळेला जुगार हा पुढे आयुष्यभर खरं म्हणजे सांभाळून घ्यायचा असतो. तो सांभाळून घेताना आपली व्यक्ती म्हणून  प्रगती होते कि अधोगती हेच त्याच्या यशस्वीतेचं मोजमाप असतं.
आमचीही तीच अवस्था होती.  कोर्टशिप चालू असताना आमची भेट म्हणजे वेगवेगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठी भेटी . रोमॅन्स चा र काय असतो हे मला माहीत नाही , असं सुरवातीलाच #betterhalf ने डिक्लॅर केल्यामुळे परत कधी त्यावर चकार शब्द मी काढला नाही. मीही ही संधी साधून माझ्या कडून ज्या गोष्टी मुळीच होणं शक्य नाही त्या सांगून टाकल्या. तसंच आमचे अडनिड्या वयातले क्रश, ( आम्हा दोघांचीही मजल क्रश पर्यंतच ) एकमेकांना सांगून टाकले, त्यामुळे एक बरं झालं,  त्यानंतर एकमेकांच्या मित्र मैत्रिणींना खुलेपणाने भेटत राहता आलं,  सगळीकडे दोघांनी जायचा अट्टाहास कोणीच ठेवला नाही, कारण एकमेकांबद्दल कोणतीच शंका घ्यायला जागा नव्हती.

आज मी मोकळेपणाने माझं अवकाश शोधून माझ्या आवडीचे काम करते, तो देखिल  त्याचे सगळे छंद व्यवस्थित चालू ठेवतो. आपापली प्रगती साधताना सगळंच काही सरळसोट नव्हतं. इतक्या वर्षांत भरपूर वादविवाद झाले,  अगदी बॅग भरून चालू लाग पासून घटस्फ़ोट देऊन मोकळे होऊ इथपर्यंत.  पण एक पक्कं माहीत होतं,  कि आपण काही सर्व गुण संपन्न आणि परफेक्ट नाही,  मग समोरचा असेल असा आग्रह कधीच धरला नाही.  म्हणूनच माणूस आहे,  दोघेही चुकणारच, चुकले कि भांडणार, मग अबोला, मग राग शांत होणे मग एकाने ईगो बाजूला सारत साॅरी म्हणणे, दुसर्याने माफ करणे, हे सगळं आपसुक स्वीकारलं गेलं .

आता इतक्या वर्षांनी म्हणता येईल कि सहप्रवाशाची पुरेपूर ओळख पटली  आहे .
एकमेकां सोबत इतर सर्वांची काळजी घेत कौटुंबिक प्रवास करण्याचं गमक उमगलं आहे .
व्हॅलेंटाईन डे आजवर कधी आला कधी गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही .
ना कधी ऍनिव्हर्सरी मुद्दाम सेलिब्रेट केली .
गिफ्ट्स चं अप्रूप असतंच पण अट्टाहास दोघांनाही नव्हता .
पण एकमेकां साठी केलेल्या छोट्या मोठ्या कृतीतून , आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या पद्धतीतून कधीतरी एकमेकांचे व्हॅलेंटाईन होऊन गेलो खरे .


Friday, February 2, 2018

whatsapp moms

व्हॉटस ऍप क्रांती घडल्यापासून शाळकरी मुलांचे पालक विशेषतः आया यांना अल्लदिन चा जादुई दिवा मिळाला आहे . हि क्रांती घडण्यापूर्वी , मूल आजारी पडून त्याची शाळा बुडली , तर आयांचे हाल असत . खुद्द मी , लेका  च्या वेळी बुडलेला अभ्यास उतरवून घेण्याकरता जवळच्या लांबच्या वर्गमित्रांच्या घरचे उंबरे झिजवल्याच्या आठवणी आहेत . पण व्हॉटस ऍप  आलं , शाळा पालकांचे ग्रुप्स तयार झाले , आणि आयांची मोठी चिंताच मिटली .
मूल गैरहजर राहिलं , कि घरबसल्या बुडलेल्या अभ्यासाच्या इमेजेस ऑन रिक्वेस्ट ग्रुप वर मिळायला लागल्या . एखादं मूल शाळेत हजर राहून देखील नीट क्लास वर्क होमवर्क उतरवून घेत नाही , ती हि काळजी मिटली . अमुक वहीतलं तमुक पानावरचं अमुक प्रश्नाच्या तमुक उत्तराची शेवटची ओळ , बंड्या / बबडी ने अर्धवट लिहिली ? वांदा नाई . व्हॉट स ऍप  झिंदाबाद . 
काही छोटे मोठे निरोप जसं आज हे आणा , उद्या ते आणा , पोरं घरी येऊन नीट सांगत नाहीत त्याची खातरजमा करायला हा ग्रुप सज्ज असतो . शाळाबाह्य उपक्रम झाले , आंतरशालेय क्रीडा स्पर्धा झाल्या , ऑलिम्पियाडस झाल्या , त्यात कोण चमकले , अगदी फोटो , मेडल , ट्रॉफी सकट  सर्व अपडेट्स पालकांना घरबसल्या / ऑफिसबसल्या मिळतात .  मूलं शाळेत बरेचदा काही ना काही विसरून येतात , अथवा एकमेकांच्या पेन पुस्तकांची अदलाबदल देखिल  होते . वर्गाबाहेरील एखाद्या उपक्रमात कधी कधी चक्क एका पायात आपला बूट तर दुसऱ्या पायात दुसऱ्याचाच बूट अशा अवस्थेत मूल घरी येतं . तीही शहानिशा ग्रुप वर  होऊन लगेच दुसऱ्या दिवशी मुलं आपापल्या वस्तू परत मिळवतात . 
तर एकूण रामराज्य आहे म्हणा ना ! 
पण कितीही सोयी आल्या , गॅजेट्स आली , त्याचा उपयोग करताना आपण जर ताळतंत्र सोडून दिलं , तर त्याचा त्रास च होताना दिसतो . या व्हॉट स ऍप ग्रुप्स च्या जगात एक एक पालक असे रथी महारथी सापडतात कि त्यांच्यावर हसावं कि रडावं असा प्रश्न पडतो . मुळात हल्ली झालंय काय , कि शाळा - शिक्षक म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि पालक - मुलं म्हणजे कन्ज्युमर अशी धारणा बऱ्याच पालकांनी करून घेतलीय . त्यामुळे यांच्या सतत काही ना काही तक्रारी असतात .
 शाळेकडून एखाद्या उपक्रमाचा एस एम एस आला , कि लगेच ग्रुप वर पालक त्याची चिरफाड करतात . हे असंच का केलं , तसंच  का ठरवलं ....वगैरे वगैरे .  सगळ्यात आधी शाळेचा एस एम एस आला , कि ग्रुप वर लगेच तो शेर केला जातो . इथवर ठीक आहे , कारण काहींना वेळेवर मेसेज पोचत नाहीत . त्यावर कढी म्हणजे काही आया एकमेकींना विचारतात , "कोणाकोणाला आला मेसेज ? तुला आला का, मला नाही आला " मग या ला उत्तर देणं सुरु होतं  . एक एक आयांचे हात वर येतात , मला आला , नाही आला, आला , नाही आला . दरवेळी यातून काय हशील होतं , हे मला ना सुटलेलं कोडं आहे . खूपदा त्यांना सांगावंसं वाटतं , बायांनो , नसतील येत शाळेचे मेसेज , तर शाळेत जाऊन सांगा , इथे डोकी लढवण्यातून काय होणारे ? 
बरं , आता ग्रुप वरच्या सर्वच आया काही एकमेकांना ओळखत नसतात , पाहिलं देखील नसतं वर्ष वर्ष , मग कुणीतरी अति उत्साही मेम्बर टूम काढते , आपापले फोटो टाका . साधारण ३०-३५ इमेजेस येऊन आदळतात ग्रुप वर . नशीब ऑटो डाउनलोड ऑफ केलय म्हणून , नाहीतर रोजच्या रोज गॅलरी रिकामी करावी लागली असती . 
ग्रुप नवीन होता तेव्हा अशाच अति उत्साही मातेने प्रत्येकीला आपापली आणि आपल्या मुलांची बर्थडेट टाकायला सांगितली . आता शे दीडशे आया असलेल्या ग्रुप वर रोज किमान एका छोट्याचा किंवा आईचा वाढदिवस निघतोच . मग रोज कोणा  कोणाला ५० एक आया तरी बर्थडे विशेस पाठवत राहायच्या . त्यात व्हायचं काय , कि महत्वाचे निरोप , नोटिसेस पार दबून लपून जायच्या . माझ्या सकट  काही समविचारी आयांनी हे थांबवायला सांगितलं तर आमचं  कोणी ऐकेना . उशिरा का होईना , आता त्यांना हे पटलंय म्हणा किंवा सुरवातीचा उत्साह आता मावळलाय म्हणा , ती पीडा आता बंद झालीय . 
तीच गत जोक्स , पोलिटिकल फॉरवर्ड्स असलेल्या पोस्ट्स . या देखील स्कुल ग्रुप वर नसाव्यात हा प्रस्ताव मांडला गेला होता . तो हि सुरवातीला धुडकावला गेला .त्यामुळे इतर कुठल्याही ग्रुप आणि हा ग्रुप यात काही वेगळा वाटत नव्हतं . ज्या  गरजेपोटी या ग्रुप ची निर्मिती केली जाते , तो उद्देश साध्य होतंच नव्हता . या पोस्ट्स च्या गर्दीतून महत्वाचे अपडेट्स शोधात बसायला फार त्रास पडायचा . कालांतराने ते हि पटलं म्हणून आता ती भाऊगर्दी देखील आटोक्यात आहे .
या सगळ्यावर कहर म्हणजे परीक्षे च्या आदल्या रात्री जाग्या होणाऱ्या आया . नियमित पणे राहिलेलं मिळण्याची सोय असताना तेव्हा गायब असणाऱ्या , कधी काही न विचारणाऱ्या आणि दुसऱ्याला पाठवणाऱ्या , निवांत असणाऱ्या अथवा सो कॉल्ड बिझी असणाऱ्या आया , एक्झाम च्या एक दिवस आधी अचानक जाग्या होतात , मुलांच्या वह्या तपासल्यावर त्या अपूर्ण आहेत असा साक्षात्कार झाल्यावर , त्या क्षण पासून ग्रुप वर त्यांचे रिक्वेस्ट्स पडायला लागतात . बरं , एखादा प्रश्न किंवा २/३ पानं यावर त्यांचं भागणार नसतं . २/३ विषयांचे धडे च्या धडे त्यांना इलेव्हन्थ अवर ला हवे असतात . एकदा अशा एका आई ला उर्मट वाटेल इतक्या स्पष्टपणे मी न राहवून सांगितलं , " प्लिज अशी लास्ट मिनिट मदतीची अपेक्षा करू नका . आमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासातून उठवून तुम्हाला इमेज पाठ्वण्या करता त्यांच्या वह्या हातातून घेण्याची हि वेळ नाही . "
काही आयांना शे दीडशे मेम्बर्स एका ठिकाणी मिळाले कि ओपन मार्केट मिळाल्याचा फील येतो . मग पडायला लागतात टप्परवेर प्रोडक्ट्स च्या , ड्रेस मटेरिअल्स च्या ऑनलाईन मार्केटिंग च्या , इमेजेस आणि जाहिराती .
हा उद्देश देखील आता हणून पडला आम्ही तो भाग वेगळा .
तर मंडळी सांगण्यास आनंद होतो आहे कि सर्व निगेटिव्ह गोष्टींची चाळणी होऊन आता खऱ्या अर्थाने आमचा शालेय ग्रुप मार्गावर आला आहे .

Monday, January 22, 2018

Better half

पाककलेतील # Better half # ची आवड व गती सर्वश्रुत आहेच .
त्याच्या आवडीची सुरवात engineering च्या दिवसात आजी च्या किचन मधे आमलेट करण्यापासून झाली .
ठाणे जिल्ह्यातील पडघा या पहिल्या जाॅब साईट वर मात्र ती त्याची गरज बनली .
परत येऊन पुण्यात सेटल झाल्यावर पहिल्या सारखंच आईच्या हातचं सर्व असल्यामुळे आवड व गरज दोन्ही मागे पडलं .
लग्न झाल्यावर माझ्या एन्ट्री ने चित्र फार काही बदललं नाही . आईच्या हातचं जेवणारी मी, सासू च्या हातचं जेवायला लागले . स्वैपाक करण्याची वेळ माझ्यावर 2 वर्ष तरी आली नाही .
माझी स्वैपाकातील गती त्या वेळी शून्याहून खालीच होती . आमटी फक्त करता येत होती .
एक तर 21 व्या वर्षी म्हणजे त्या वेळच्या मानाने देखील बालवयातच लग्न झालं होतं . रोजचा स्वैपाक सोडून इतर पाककृती माहेरी फारशा केल्या जात नव्हत्या . विशेष कधी काही किचन मधे आकार घेताना पाहिल्याची किंवा घरी जेवणावळी झडल्याच्या किंवा सणासुदी ला गोडधोड केल्या च्या कुठल्याच आठवणी माझ्यापाशी नव्हत्या म्हणा ......किंवा मलाही विशेष आवड निर्माण झाली नाही म्हणा.......
या प्रांतात खर्या अर्थाने ज्येष्ठ बाळाच्या आगमना नंतरच माझा प्रवेश झाला . बाळा साठी खिरी , सूप्स तत्सम पदार्थांचे विविध प्रकार शिकणं आणि करणं तेंव्हा सुरू झालं . त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्या सरशी मीही पाककलेत एक एक पायरी वर सरकत होते . जबाबदारीची जाणीव आता पूर्ण आली होती . ती संपूर्ण पणे अंगावर पडली ती मात्र स्वतंत्र राहण्याच्या 6 वर्षात .
इकडे आम्ही दोघेच होतो . जवळ सासूबाई नव्हत्या . खवय्येगिरी एव्हाना दोघांच्या अंगात भिनली होती . सासूच्या हातचं चांगलंचुंगलं जिभेवर रेंगाळत होतं . तेंव्हा पुनश्च #  better half # ची गरज व आवड उफाळून आली . मग काय त्याच्या पुढाकाराने चटपटीत चमचमीत पदार्थ करण्याचा आम्ही सपाटा लावला . ' खवय्ये ' टाईप कार्यक्रम मी नेमाने पाहू लागले . बेसिक केक ची रेसिपी मी शिकून घेतली . पंजाबी प्रकार होऊ लागले .
तरीही पारंपारीक गोडधोड किंवा ठेवणीच्या पदार्थांकडे मी वळण्यास फारशी उत्सुक नव्हते .
# better half # ने एक दोनदा सांगून पाहिलं , मी दाद देत नाही म्हटल्यावर आपल्या आवड व गरजेची गाडी फुल गियर वर टाकून सुटलेच या वाटेवर . पहिला प्रयोग केला रव्याच्या लाडवांचा . तो पहिल्या वेळी बत्त्याने कुटावा लागला, तर दुसर्या वेळी त्याची खीर प्यावी लागली . पण गडी हरला नाही . परत एकदा प्रयोग केला, आईला परत नीट विचारून घेतलं , व पुढचा प्रयोग यशस्वी करून दाखवला .
मग # better half # नां कमालीचा हुरूप आला . पुढची मोहीम ठेवणीचे पदार्थ . त्याच्या हातची कैरीची, लिंबाची व मिरचीची लोणची ( भले मसाला तयार का असेना, घाट घालणं महत्वाचं ) खाऊन अनेकांनी बोटं चाटली आहेत .
दर ऊनहाळ्यात त्याला फोन येतात.....वाट बघतोय....बरणी आणून तयार आहे. 😉
नाॅन व्हेज हा त्याचा वीक पाॅईंट . त्यात तर तो मास्टर शेफ आहे .
दरम्यान मी एकीकडे मुलांच्या schedule नुसार आणि त्यांच्या indivisual गरजेनुसार चारी ठाव सर्वांच्या पोटी पौष्टीक खुराक जात राहील इतपत बेसिक ( पण माझ्या दृष्टीनं ' लई ' झालं) 😆 पारंगत झाले होते . त्यात अधे मधे # better half # च्या डोक्यात येणार्या exercise आणि डाएट प्लॅन बरहुकूम करणे ही आलेच .
स्वतःची पाठ थोपटायची हुक्की आली कि # better half# नवीन पदार्थां ची नावं सुचवून माझी complacency आटोक्यात ठेवत असतो. 😁
मजल दर मजल करत आमची गाडी मग सणवार स्पेशल मधे ही लुडबूड करू लागली . गणेश चतुर्थी च्या दिवशी order चे पण त्या पाच दिवसात एकदा कधीतरी घरी मोदक , संक्राती ला वड्या..... नाही पडल्या तर लाडू , 😃 दसर्या चं श्रीखंड , असं आम्ही करत असतो.
मटार सीझन मधे करंज्या, भोपळ्याचे घारगे ,
असे घाट आम्ही घालतो ते त्याच्याच पुढाकाराने .
आता तर लेक सुद्धा mini chef चे workshops करत असते अधून मधून . मग आम्ही दोघी brownies , cup cakes करतो .
लेकाला बाबाचं बघून स्वावलंबनाची शिकवण मिळाली आहे . आई च्या वरताण बायको मिळाली तर काय घ्या😂😅😃 या भितीने बहुतेक तो ही माझ्याकडे वरण भात, पोहे, आमलेट करायला पटकन शिकला आहे . मध्यंतरी शाळेत जेव्हा लेकीने घारगे short recess साठी नेले व बाबांनी आणि तिने मिळून केले असं मैत्रिणींना सांगितलं, तेव्हा मैत्रिणिंचे चेहरे नक्कीच बघण्यासारखे झाले असतील .
असो.....तर हा सगळा......( झाकली मूठ सव्वा लाखाची....जाहीर खुली करण्याचा ) खटाटोप कशासाठी ?
तर.....एक म्हणजे.... आजूबाजूला बोट दाखवायची पाळी आली कि लिहायला भरपूर विषय दिसतात.....पण तेच बोट जरा स्वतःकडे रोखून पहायचं होतं.
दुसरं म्हणजे बाईला स्वैपाकाची नावड ही जरी प्रौढी मिरवायची बाब नसली , तरी लाज वाटण्याजोगी देखिल निशचित नाही हे ही नमूद करायचं होतं .
तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे # better half # ने या बाबतीत मला सांभाळून घेतल्याबद्दल त्याला जाहीरपणे कडक salute ठोकायचं होतं .

Tuesday, January 9, 2018

adnyanacha buruj

अज्ञानात सुख असतं म्हणतात ते काही उगीच नाही .
आपल्याला मारे वाटतं - आपण संपन्न , शिक्षित घरात जन्मलो , आपल्याला संधी उपलब्ध झाल्या , म्हणजे आपण रूढी परंपरांपासून , लिंग भेदा पासून मुक्त आहोत .
पण  ......
 एखादा अनपेक्षित क्षण असा आदळतो आणि आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो .

आपल्याला समजतं   .......  आपण भराऱ्या घेतोय , पण  आपलं आकाश बंदिस्त आहे .
आपण विहार करतोय ... ... पण आखून दिलेल्या परिघात .

' आखून दिलेल्या ' या कडे आपली डोळेझाक होते ..... .... तिथेच आपण चुकतो .
भ्रमात फिरत राहतो , मोठ्या बाता  मारतो . आपल्याहून उच्च किंवा निम्न स्तरातील स्त्री वर्गा बद्द ल उसासे टाकत राहतो . लिंगभेद , जातीभेद , वर्णभेद इत्यादी सर्व प्रकारच्या विषमते बद्दल आपली मतं हिरीरीने मांडतो .

आणि अचानक एक दिवस हि विषमता आपल्या समोर दाण दिशी येऊन आदळते .
आपण गडबडतो , पण वस्तुस्थिती बदलत नाही .
आपल्या गावीही नसलेली एखादी शुल्लक घटना , जवळच्यांच्या भुवया उंचावून जाते .
आपण अतिशय निर्लेप मनाने भाग घेतलेल्या प्रसंगात , इतरांना नको ते कंगोरे दिसू लागतात .
आपल्याला अजिबात न शिवलेल्या विचारांनी बाकीचे ग्रस्त होतात .
आणि आपल्यावर कधीही कल्पना न केलेला घाव बसतो .
आपण दिवा स्वप्नातून जागे होतो .

घाव घालणारे आपलेच असतात .  त्यांना न जुमानण्याची परिस्थितीच नसते .
 पण तीच माणसं जेव्हा समजण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या त्यांचं आजवर माहित नसलेलं  रूप दाखवतात तेव्हा तर उरलं सुरलं अवसान गळून पडतं .

प्रसंग अनेक येतात .
आपल्याला मुक्तपणे स्वछंदी वृत्ती जोपासत वाढवणारे आपले आई वडील , मुलगी लग्नाच्या बाजारात आली , कि सपशेल माघार घेतात , संकुचित वागतात , तेव्हा एखाद्या मुलीला हेच वाटत असेल .

सुनेच्या अंगभूत कलांचं सर्वत्र कौतुक करताना , तिने त्या कला घरापुरत्याच ठेवाव्यात , त्या घराबाहेर विस्तारू नये , हे जेव्हा तिला सुचवलं जातं , तेव्हा एखाद्या सुनेला हेच वाटत असेल .

बायको सोशल ड्रिंकर चालते , नव्हे तिला मागे न पडण्यासाठी सोशिअल ड्रिंकिंग साठी प्रोत्साहित करणारे नवरे , तिला हव्या त्या उपक्रमात भाग ' घेऊ  देणारे ' नवरे जेव्हा केवळ पुरुष ग्रुप आहे म्हणून ट्रेक करू नको म्हणतात त्या बायकोला हि हेच वाटत असेल .

एकत्र वाढलेला , लाड करणारा , माहेरपणाला बोलावणारा भाऊ , जेव्हा बहिणी ने इस्टेटीवर सह्या करून तिचा वाटा  त्याला देऊन टाकावा अशी अपेक्षा करतो , तेव्हा त्या बहिणीला हि हेच वाटत असेल .

अनेक उदाहरणं दिसतील आजूबाजूला . प्रत्येकाचं ठाम मतही असेल आपापल्या बाजूचं . 

पण आपले बुरुज काही अंशी ढासळतात , हे मात्र खरं .
आता त्याला डागडुजी करून सावरून घ्यायचं , का पूर्णपणे जमीनदोस्त करून नव्याने किल्ला बांधायचा कि काहीच न झाल्यागत वावरायचं हे जिचं त