Saturday, March 7, 2020

KarmatNahi


तू सदैव जमवून घेतलंस , मी फक्त नवरेशाही गाजवली

आज 50 वर्ष होऊन गेली आपल्या संसाराला.
त्या वेळी एकच रिवाज. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा.
मीही तसाच वागलो.  तू माझ्या हो ला हो करत गेलीस.
सदैव माझ्या करता झटलीस,  माझ्या घराला घरपण आणलंस.
त्या वेळी या तुझ्या समर्पित वृत्ती ची कुठलीच दखल मी घेतली नाही.  तू असंच वागणं अपेक्षित होतं, त्यात काय मोठं,  उलट तू तशी वागली नसतीस तर मी ते मुळीच खपवून घेतलं नसतं.

आज एक एक प्रसंग आठवला तरी मला स्वतःची लाज वाटते.  तू तुझ्या माहेरी गेली होतीस. येणार होतीस त्याच्या एक दिवस उशीरा आलीस, मी स्टेशन वर तुला घ्यायला आलो होतो,  तू अप्पांबरोबर गाडीतून उतरल्या उतरल्या मी त्यांच्या समोर तुला फैलावर घेतलं. किती हिरमोड झाला असेल तुझा.
तुला सिनेमा बघायची भारी हौस. मला काही कामामुळे तुला नेणं  शक्य नसायचं, पण तू मैत्रिणींच्या बरोबर जावंस हेही मला कधी चाललं नाही.
तुझं असं विश्व कधी तू बनवू शकली नाहीस, मी आखून दिलेल्या पारिघात जमेल तसं वावरलीस कोणत्या ही  तक्रारीविना. पाहुणे रावळे सांभाळलेस , सासू ची सेवा केलीस तरी माझं कधी समाधान व्हायचं नाही.
मी मात्र आज हे उद्या ते करत करत घरगुती व्यापात तुला अडकवत राहिलो.

जेव्हा कुठेतरी जाणवायचं कि तू नाराज आहेस तेव्हा मी एकच करायचो, दागदागिने आण, साड्या घे, पण तुला हवा होता मायेचा शब्द पण मी समजून घेण्यास असमर्थ होतो. मला लोकसंग्रह करायची भारी हौस . पण घरच्यांना कसं आपलेपणाने बांधून ठेवावं हे मला कधी समजलंच नाही.

आता आज हे सगळं का बोलतोय मी असं तू म्हणत असशील , पश्चात बुद्धी दुसरं काय.....
आज लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करायला माझ्या सोबत तू नाहीस.......
आता हाती उरलंय फक्त तुझ्या अगणित फोटों कडे बघत राहणं.
आता हाती उरलंय फक्त तुझ्या पुतळ्याला हार घालणं.
माणूस आपल्या सोबत असतो त्या वेळी आपण किती गृहीत धरतो हे आता कळतंय.
नियतीने मारलेल्या या एका चपराकी ने मी भानावर आलो.

पण ........
करामत नाही.......घर घर वाटत नाही......




Samaanta

राहुल आणि रुचिता चा समानतेचा संसार आता वीस वर्षांचा झाला. त्याला आता मुरलेल्या लोणच्याची चव आली. ज्येष्ठांचं छत्र एकएक करत हरवत गेलं. सासुबाई होत्या तोवर दोघी मिळून हौशी ने सर्व सण साजरे करीत होत्या. रुचिता ची कधी पाळी ची खेप असली तरी सासूबाई एक हाती सगळं निभावून नेत होत्या. पण त्यांनी जगाचा निरोप घेतल्यावर मात्र राहुल, रुचिता ला काही प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागले. राहुल ची बहिण रेवती तोवर यूएस ला सेटल झाली होती. त्यामुळे दोघांनी विचाराअंती ठरवलं कि आता पाळी चे निर्बंध झुगारून द्यायचे. त्याही दिवसात त्याच उमेदीने आणि उत्साहाने घरचे गौरी गणपती, दिवाळी साजरे करायचे .
सासुबाई गेल्यावर सासरे अजूनच थकले. रुचिता च्या आईच्या मागे देखिल आजारपण लागले. राहुल आणि रुचिता वर दोन्ही कडच्या जेष्ठांची जबाबदारी असे. प्रत्येकाची औषधे, लॅब रिपोर्ट, चेकिंग सगळं नियमित बघावं लागे. पुन्हा एकवार सोयीचा मार्ग काढत राहुल ने त्याच्या वडिलांचं आणि रुचिता ने तिच्या आईचं बघायचं ठरवलं. यामुळे दोघांना ऐका पेशंटवर व्यवस्थित लक्ष देणं सोपं पडे.
एरवी दोघांचं ऑफिस  आणि घर असं रूटीन चालूच होतं.
ऑफिसमध्ये आज एकच चर्चा चालु होती. वॅलेंटाईन डे प्लॅन्स ची. सगळे आपापले प्लॅन्स सांगत होते.
रुचिता म्हणाली, " आज मी घरीच थांबणार आहे मुलांच्या जवळ कारण राहुल चा आज मित्र मैत्रिणींच्या बरोबर डिनर प्लॅन आहे. " सगळ्यांचे डोळे विस्फारले.
कलीग म्हणाली, " तू हे इतक्या कूलली सांगत्येस? मी तुझ्या जागी असते तर घर डोक्यावर घेतलं असतं." रुचिता म्हणाली, " अगं  एवढं काय त्यात? मी नाही का माझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर आऊटिंग ला जात? तो ही एरवी जातोच, तसंच हे आजच्या दिवशी प्लॅन केलं तर बिघडलं कुठं? माझं काही ठरलं असतं तर मीही गेले असते.
असंच काही दिवसांनी राहुल च्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान वेगळे प्लॅन ठरत होते.
कलीग म्हणाला," चला या वर्षी आपण आपली जेन्टस ओन्ली बॅन्काॅक ट्रीप ठरवूनच टाकू."
" अरे पण घरी काय सांगणार?"
" सांगायचं की सरळ, त्यात काय, बाॅईज जस्ट वाॅन्ट टू हॅव सम फन, एक ब्रेक हवाच यार, एरवी संसार करतोच आहोत ना इमानेइतबारे." राहुल म्हणाला," डोन्ट काऊन्ट मी इन, तुमचं चालू द्या. "
" का रे बाबा, घाबरतोस की काय रुचिता ला सांगायला?"
" नाही रे, सांगायला नाही घाबरत. पण आपल्याला हवा तो चेंज तिला देखिल घ्यावा असं उद्या वाटलं तर मी तिला कोणत्या तोंडाने अडवू शकेन? ती तिथे जाऊन आपल्या सारखं 'एन्जाॅय' करून आलेली मला कितपत आवडेल, मग केवळ मी पुरुष म्हणून हवं ते करणं मला पटत नाही. व्हाय शुड ओन्ली बाॅईज हॅव ऑल द फन?
समानतेच्या या सडेतोड युक्तिवादाने सगळ्यांची तोंडं बंद झाली हे वेगळं सांगायला नकोच.

Thursday, March 5, 2020

Samanta#navatkayahe

#नावातकायआहे#

हीच रुचिता ची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. जेव्हा राहुल ने त्याचा मानस तिला बोलून दाखवला होता . आपल्या धाकट्या अपत्याचे लेकीचे नाव बदलण्याचा .....
म्हणजे तिच्या नावातील वडील म्हणून आपले असलेले नाव काढून , आई म्हणून रुचिता चे नाव घालण्याचा . आई म्हणून नुसते कर्तव्यापुरते , लाडापुरते नाही , तर दोन मुलां पैकी एकाच्या नावाशी कागदोपत्री देखील आईचे नाव जोडले जावे हा त्याचा सरळ साधा हेतू .

आता नवऱ्याचा सरळ साधा हेतू बायकोच्या सहजासहजी पचनी पडला तर कसं चालेल ? तिला असंख्य प्रश्न पडले . मुळात आत्ता हे करायची काही गरज आहे का ? त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ? लेकीच्या पुढील कागदपत्रांमध्ये काही अडचण अली तर ? राहुल चं उत्तर तयार होतं , पुढे अडचण येऊ नये म्हणून हीच योग्य वेळ आहे . ती म्हणाली , उद्या लग्न झाल्यावर आपलं आडनाव तरी लेक पुढे लावणार आहे का हे कुठे नक्की आहे ? आडनावाचाच भरोसा नाही तर माझं नाव जोडलेलं राहील याची काय शाश्वती ? यावर तो म्हणाला  लगेच १० वर्षात तिचं लग्न लावणार आहोत का आपण ? पुढचं पुढे बघू . हि लगेच म्हणाली , मग लेकाचं का नको ? राहुल चं हि बरोबर होतं मुलाच्या स्कूल लिविंग आणि मार्कशीट वर  आधीच वडील म्हणून त्याचं  नाव आलंय . त्या पेक्षा लेकीचं बदलणं सोपं आहे .

मग रुचिता ने  ब्रम्हास्त्र काढलं . तुझ्या लेकीला चालणार आहे का विचार आधी . नाही  म्हटलं तरी तो ही गडबडलाच . लेकीला एव्हाना स्वतःची मतं आहेत हे तो चांगलंच जाणून होता . लेकीसमोर हा  विषय काढताच अपेक्षित रिऍक्शन आली
"हे काय ...... नाव का बदलायचं ? मला सवय झाली आहे याच नावाची , मी एकटीच शाळेत आणि बाकी सगळीकडे ऑड मॅन आऊट होईन , मग सगळे काय म्हणतील" वगैरे प्रश्नांच्या फैरी झडल्या .

रुचिता  गालातल्या गालात हसत होती . राहुल ने काही दिवस जाऊ दिले . थोडे लेकीच्या कलाने वागून घेतले . लेकीने हि संधी ओळखून वरचेवर काही दिवस बाहेरून पार्सल ऑर्डर्स मागवून घेतली . पुन्हा हा विषय लेकीसमोर काढल्यावर ती परत आपल्या मागच्याच भूमिकेवर ठाम . ती बधायला तयार नाही म्हटल्यावर त्याने त्वरित खिसा आवरता घेतला आणि आपला पवित्रा  बदलायचे ठरवले. लेकीला  समज तशी चांगली होती , हे तो जाणून होता. त्यामुळे आता सरळ तिच्याशी आपली या विषया  मागची भावना शेअर करायचे त्याने नक्की केले .
या शेअरिंग चा मात्र हवा तो परिणाम झाला आणि लेक तयार झाली.

आता त्याने मैदानच मारले म्हटल्यावर रुचिता  ला नवीन काही मुद्दे उरलेच नाहीत . लगोलग राहुल  कामाला लागला , आवश्यक ती तजवीज केली , आणि मनात आलेला विचार कृतीत उतरवला . इतके दिवस काथ्याकूट करता करता वारंवार कानावर पडत असलेले नवीन नाव एव्हाना घरात सर्वांच्याच सवयीचे झाले . त्यामुळे त्यातील वेगळेपणाचा अंश तर गेलाच , आणि त्या जागी नव्या समानतेची नांदी आणणारे लेकीचे बदललेले नाव सर्वांच्या मुखी शोभू लागले.
रिद्धिमा रुचिता साने.







Samaanta2

#भाग2नवराबायको
"राहुल, आज रात्री मी घरी नाहीए, लक्षात आहे न? "
"का गं, कुठे टूर का?"
"अरे टूर कसली, विसरलास ना? रेवती ची मंगळागौर नाही का? तुझ्या बहिणीचा कार्यक्रम तरी विसरू नकोस रे?"
"ओह, विसरलोच, अगं पण तुला एकाच दिवशी दुसरं पण काहीतरी होतं न? तुझ्या मैत्रिणीची पण मंगळागौर होती ना?"
"आहे ना, मी गार्गी कडे संध्याकाळी हळदीकुंकु ला जाऊन रात्री आपल्या घरी रेवती च्या जागरणाला जाणार आहे. मी आईंना कळवलंय तसं तू रात्री ये तिकडे डायरेक्ट जेवायला.
"ओके चल गुड बाय "

"ये रुचिता, जा चेंज करून ये, जेऊन घे मग मस्त जागून धमाल करायची आहे."
"अरे वा, रुचिता आली का? आम्हाला वाटलं जमणार नाही तुला जागरणाला यायला. तशीही पुजेला आणि हळदीकुंकु ला नव्हतीसच तू."
"काकू अहो आमचं आधीच बोलणं झालं होतं, शेवटी सगळ्यांची एकत्र भेट होणं महत्त्वाचं बाकी फक्त जमायला निमित्त आहेत."
"हो बाई विसरलेच, तुमचं काय बाबा ते समानता वगैरे जपणारं कुटुंब."
"काकू अहो समानतेचा हक्क मागणार्या आम्ही माणूसघाणी नसतो. मला तुम्ही सगळी माणसं हवी आहात. तुमच्या आमच्या कुटुंबात फरक इतकाच आहे कि आम्ही एकाचे लाड करताना दुसर्याची  गळचेपी होऊ देत नाही, सगळ्यांना स्पेस देत एकत्र येतो आम्ही."
"वा,वा,छान छान, म्हणजे नक्की काय करता तुम्ही?"कुतूहल म्हणून विचारतेय हं."
"हो सांगते न, संसार, मुलं, करियर आमचं दोघांचं आहे,  त्याची उस्तवार आम्ही दोघे मिळून करतो. घरातील कोणत्याही कामाची हे बाईचं हे पुरुषाचं अशी विभागणी नाही. बाहेरच्या आघाडीवर आम्ही जितक्या समान पातळीवर आहोत तितकेच घरीदेखिल आहोत. वीकेंड ला सुद्धा  राहुल आणि मी आपापल्या वेळेची समान विभागणी करत मित्रांच्या संगतीत कधी एकेकटे कधी एकत्र एंजाॅय करतो. अशाने मुलांजवळ नेहमी आमच्या पैकी एक जण असतंच आणि आम्हाला ही आमच्या अॅक्टिविटीज बिनधास्त करता येतात. मुलांचा अभ्यास ज्याला जसा वेळ असेल तसा घेतो. रोज मुलं शाळेतून पाळणाघरात जातात त्यामुळे त्यांचा कुठलाच भार घरातल्या ज्येष्ठांवर पडत नाही. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे लाईफ जगता येतं, कोणत्या ही कायमच्या जबाबदारी विना नातवंडांना नुसतं भेटता येतं. "
"आला आला राहुल सुद्धा आला......तुझंच कौतुक चाललंय राहुल."
"थॅन्कस, पण खरंच काही विशेष नाही उलट हल्ली या बेसिक गोष्टी केल्याच पाहिजेत. काकू आमचं व्हायचं काय कि आम्हाला उत्तम शिक्षण आणि उत्तम करियर ची बायको तर हवी पण तिचा घरातला भार आम्ही पुरुष कमी नाही करणार, ते एकतर बायकोनंच सुपरवुमन होऊन करायचं किंवा मग आमच्या आया सासवांनी करायचं. आम्ही मात्र एक मूल जन्माला घालायचं योगदान देऊन संसारातून मुक्त. हे किती दिवस चालणार ."

समानता पुरेपूर अंगीकारलेल्या या नवरा बायको चे असेच स्वप्नचित्र तुमच्या मुंलांसाठी पाहताय ना?
ही







Wednesday, February 26, 2020

Swapratima

आपल्या जन्माचा सोहळा होतो, बालपण देखिल कोडकौतुकात न्हाऊन निघतं.  पण मोठे होत जातो तसतसे या कौतुकाची किंमत मोजावी लागते.  परीक्षेत यश मिळवले तर शाबासकी,  करिअर मार्गी लागले तर कौतुकास पात्र. पैसा असला तर समाजात मान.

आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीत लहानाचे मोठे होतो, त्यानुसार आपली स्वप्रतिमा तयार होत जाते. अखंड मायेची पांखर मिळालेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा अतिशय बळकट असते. या उलट मायेची तहान न भागलेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा खालावलेली असते.  अशा व्यक्ती येन केन प्रकारे ही तहान भागवण्यासाठी झटत राहतात.  स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देत,  लोकांना  मदत करण्सायाठी सतत धडपडत मिळालेल्या चार कौतुकाच्या शब्दांनी आपली तडा गेलेली स्वप्रतिमा सांधायचा यांचा सतत प्रयत्न असतो.

माझीही स्वप्रतिमा काही फारशी बरी नव्हती.  हे चित्र बदललं वयाच्या 25 वीशी नंतर. स्वतःला काय हवं ते नेमकं कळल्यावर, त्या करता योग्य पावले उचलून यशाची चव चाखल्यावर या स्वप्रतिमेत अनुकूल बदल घडत गेले. आता 40 शी पार केल्यावर मनात अपार शांतता आहे. कुणाला मी आवडो न आवडो, मला काही फरक पडत नाही, मला मी आवडते हेच पुरेसं आहे.

कुणाला काही पटवून द्यायचं नाही,  कुणावरही छाप पाडायची नाही. मी जशी घडत इथवर आले या प्रवासाचा मला अभिमान आहे.  मी कधीच ओढून ताणून मैत्री केली नाही,  निव्वळ एखाद्या गटाचा भाग व्हावं म्हणून कधी भिशी ग्रुप जाॅईन केला नाही,  घरी दरी त्यागमूर्ती बनत बसले नाही. सुपरवुमन या गोंडस नावाने कधी मला भुलवलं नाही आणि बाह्यरूप तर अट्टाहासाने कधीच मिरवलं नाही.

मला जो पेहराव कमफर्टेबल वाटतो तो मी करते, घड्याळ आणि चष्मा हेच माझे दागिने आहेत, बदलणारे फॅशन ट्रेंड्स मला अस्वस्थ करत नाहीत,  त्यातलं जे आवडेल आणि सोयीचं असेल तेच मी अंगिकारते. माझ्यासाठी फॅशन आहे,  फॅशन साठी मी नाही.

या अंतर्मनातल्या क्लॅरिटीचा लिहायला सुरुवात केल्यावर तर मला फारच उपयोग झाला. काय होतं,  एकदा का सोशल मीडिया वर व्यक्त व्हायची चटक लागली कि मिळ्णर्या लाईक्स,  कमेंट्स कडे आपलं लक्ष असतंच ते कोणाला सुखावणार नाहीत. पण आपलं लिखाण सर्वांना आवडायलाच हवं असा काही माझा अट्टाहास नाही. लोकांना वाचायला वेळ, गरज किंवा ईच्छा असतेच असं  नाही,  वाचलं तरी सगळ्यांना ते रुचेल आवडेल असं नाही. अगदी आवडलं तरी लाईक,  कमेंट आणि फाॅलो करायचं का नाही हा ही अधिकार त्यांना आहेच त्यामुळेच लाईक्स किंवा फाॅलोवर्स नाही मिळाले तरी मला काही फरक पडत नाही.  मी लिहितेच मुळी स्वान्त सुखाय,  त्याउपर जे वाट्याला येईल ते बोनस मानून घेते.

प्रत्येकाकडे आरसा असतो, त्यात तुमच्या प्रतिमेवर काही डाग दिसले तर जरूर पुसा,  स्वतःला असं अधूनमधून निरखून पाहणं कधीही चांगलंच,  आपली तुलना स्वतःशीच करून आपली अधिकाधिक सुधारित आवृत्ती काढायची एकही संधी दवडू नका. पण आपल्या मनाने कौल दिलेला नसेल तर दुसर्या कोणाही करता स्वतःला बदूल

Vyavhar ki naate

आज लेक अवेळी आलेली पाहून सुनीतीताई चक्रावून गेल्या. रोज मुलांभवती फिरणारं टाईट शेड्यूल सहसा न चुकवणारी लेक आज मधल्या वारी माहेरी कशी काय अवतरली बरं? बोलेल आपोआप , उगाच शंका नको काढायला. फार वाट बघावी लागली नाहीच. चहा पाणी आटपल्यावर स्वाती ने आईजवळ मुद्द्याला हात घातला.  " आई, अगं दादाचे काय चालू आहे सध्या? काम धंदा बंद करून,  घरी बिरी बसला नाही नं? आईच्या चेहर्यावर न कळल्याचा भाव बघत स्वाती पुढे बोलत राहिली. " दादाची व्यवसाय भागीदारी संपुष्टात आली आहे ते मागे बोलला होता तो. पण बाकी काही नवीन काम चालू आहे कि नाही सध्या?पुष्कळदा घरी दिसतो म्हणून विचारलं. बाकी काही खटाटोप करताना दिसत नाही. ह्यांनी सुद्धा ऑफर दिली होती एका प्रोजेक्ट ची पण नको म्हणाला दादा. "
आता सुनीतीताई ना लेकीच्या येण्यामागचं प्रयोजन समजलं. जावयांनी बातमी काढायला पाठवलं होतं तर. त्यांनी दिलेल्या प्रपोजल बद्दल त्यांना कल्पना होती पण एकदा लेकाने नकार दिला म्हटल्यावर पुन्हा तो विषय काढला नाही.  आपल्या लेकाबद्दल स्वानंद बद्द्ल त्यांना पूर्ण खात्री होती. लेकाने आजवर घेतलेल्या सगळ्या निर्णयाबद्दल  त्यांना समाधान होतं. स्वानंद धडाडीचा होता. सर्व शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून वर्षभर त्याने नोकरीचा अनुभव घेतला. नंतर भागीदारी करून आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.  7/8 वर्ष चांगले स्थिरावण्यात गेली. नंतर मात्र भागीदारीत गैरसमजातून वितुष्ट यायला लागले.  स्वानंद ला पुढल्या अडचणींची चाहूल लागताच तो सावध झाला.  एका निर्णायक क्षणी भागीदारी वेळीच  स्थगित करण्याचे ठरवून पुढे येऊ शकणार्या आर्थिक अडचणी वेळीच रोखल्या.  आता छोट्या प्रमाणात पण एकट्याने स्वतंत्रपणे तो कामं करू लागला.  एकूणच मंदी असल्याने कामं फारशी पटापट मिळत नसत. स्वानंद मग लोकांना भेटत राही , स्वतःला विधायक उद्योगात गुंतवत राही. सुनीतीताईंना आपल्या लेकाचा अभिमान वाटे.
त्याच्या निर्णयक्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास होता. अपयशाने तो खचून जाणारा नव्हता तसेच घायकुतीला येऊन अविचाराने वागणारा ही नव्हता.
यशाने कधी हुरळून गेलेला स्वानंद त्यांनी कधीच पाहिला नाही. त्यांचे संस्कार आणि घरची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी तर होतीच, शिवाय स्वानंद कधीच अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा नव्हता. व्यवसायात चांगले दिवस होते तेव्हा देखिल स्वानंद चे पाय जमिनीवरच राहिले.  त्याच्या जीवनशैलीत टोकाचा  बदल कधीच झाला नाही.  4 चाकी आली,  पण दुचाकी चालवायची त्याला कधीही लाज वाटली नाही. ब्रँडेड कपडे तो घेई पण घरच्या साध्या पेहरावात त्याला कम्फरटेबल वाटे. मधेच कधीतरी ऊंची रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेला तरी घरगुती चवीची खाणावळ त्याला कधी बिलो स्टेटस वाटली नाही.  काही सवयी मात्र त्याने कटाक्षाने लांब ठेवल्या.  4 चाकी वर कधी ड्रायव्हर ठेवला नाही आणि कुठलीच क्लब मेंबरशिप घेतली नाही.  त्याबद्दल त्याची मते अगदी स्पष्ट होती.  ड्रायव्हर आणि क्लब या चैनी खानदानी श्रीमंतांनी कराव्यात. मी धडपडत चाचपडत इथवर आलो तेवढ्यावरून मी त्यांच्याशी बरोबरी करणं मला पटत नाही. मी सदैव स्टेटस मेंटेन करायच्या प्रेशर खाली राहू शकणार नाही , मी काही जन्मजात गडगंज नाही,  धंद्यात चढउतार झाले तर सापाच्या तोंडातून गडगडत खाली येण्यापेक्षा मला सावकाश एक एक पायरी वर चढायचं आहे. नशिबात असेल तर पुढच्या पिढ्या हे चोचले करतील. स्वानंद च्या अशा वैचारिक क्लॅरिटी मुळेच सुनीतीताई निर्धास्त होत्या.
या उलट लेकीचे स्वातीच्या सासरचे वातावरण वेगळे होते. जावई आणि स्वाती ची लग्नाआधिपासून ओळख होती. त्यांनी एकमेकांना निवडून लग्न करायचं ठरवलं. सुनीतीताई जावयांच्या कुटुंबाला जुजबी ओळखत होत्या. पण जावयांचं शिक्षण धंद्याला पूरक नसणं,  तरीही अल्पावधीतच त्यांनी मारलेली मोठी उडी , झटपट आलेली श्रीमंती त्यांना काळजीत पाडत होती.  लेकीच्या निर्णयापुढे त्यांचे फार काही चालले नाही. त्यांनी देखिल घरची चांगली माणसं पाहून समाधान मानून घेतले. स्वाती आणि जावयांची जीवनशली मात्र डोळे दिपवून टाकणारी होती. दोन गाड्या,  दोन ड्रायव्हर,  मोलकरीणींचा फौजफाटा. जावयांनी स्वातीला टू व्हीलर चालवायची आता बंदी केली होती. त्यांचे निर्णय त्यांच्या पाशी असे मानून सुनीतीताई कधीही स्वाती ला या सगळ्या वरून टोकत नसत.
पण आज लेकीने भावाच्या कर्तृत्वावर बोट ठेवलेलं मात्र त्यांना मुळीच आवडलं नाही. आता तिने विषय काढला आहे तर सगळंच बोलायचं असं त्यांनी ठरवलं. " स्वाती,  अगं स्वानंद ला त्याचं त्याचं करू दे . उगीच त्याच्या सध्याच्या मनस्थितीत त्याला अजून कुठल्या भागीदारीत अडकायची गळ घालू नकोस. आपल्या नात्यात व्यवहार तर बिलकुल नको,  आपले चांगले संबंध बिघडायचे. आणि इतकं काही वेडंवाकडं घडलेलं नाही,  आमच्या गरजा मर्यादीत आहेत,  छान छोकी ची चटक आम्ही लावून घेतली नाही,  उच्चभ्रू जीवनशैली वाचून आम्ही आधीपासूनच लांब आहोत. आणि कोणी सांगितलं तुला तो हातपाय गाळून बसलाय,  त्याचे प्रयत्न चालू आहेत,  तो लोकांना भेटतोय. त्याला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा घेऊदे. आज भले त्याच्या कडे काम नसेल पण एका पैशाचे कर्ज नाही डोक्यावर हे काय कमी आहे. रात्री ची शांत झोप आणि मनःशांती आहे हेच खूप आहे. त्याला संगत आणि सवयी दोन्ही चांगल्या आहेत, अजून काय हवं,  कुणाला काही दाखवायचं नाही कि कोणापुढे उगाच मिरवायचं नाही. "
" एरवी बोलले नसते, पण आज तू स्वानंद चा विषय काढला आहेस  म्हणून मलाही जावयांबद्दल थोडं बोलायचं आहे. आज अतिशय कमी काळात खूप मोठा डोलारा उभा केलाय त्यांनी, आम्हाला आनंद आहेच. पण त्याचा पाया डळमळीत नाही ना हे बघा म्हणजे झालं. यशाची चव जरूर चाखा,  पण त्याची नशा चढत नाही ना हे तपासत राहा. उच्चभ्रू वर्तुळात स्थान मिळवायच्या  अट्टाहासापायी आपण काय किंमत मोजत आहोत याकडे लक्ष द्या. आपली जीवनशैली कर्जाच्या जोरावर असेल तर ते काही खरं नाही. उद्या दैव न करो व्यवसायात काही कमी जास्त झालं तर हा कर्जाचा डोंगर आपल्याला गाडून टाकायला कमी करणार नाही. "
" आज माझं बोलणं तुला लागेल, पण मी आई म्हणून खरं नाही बोलले, तुला आरसा नाही दाखवला तर अजून कोण दाखवणार,  सगळं जग तुला आवडेल तेच बोलेल मग भले ते तोंडदेखलं खोटं का असेना , पण फक्त मी आणि स्वानंद तुला रुचलं नाही तरी खरं तेच बोलू. बघा दोघेही शांतपणे विचार करून. आता मुलं वाट बघत असतील  तुझी, परत येशील तेव्हा फक्त भेटायला ये, मायेने विचारपूस करायला ये,  व्यवहार घराबाहेर ठेवून आलीस तर तुझं स्वागतच आहे."
स्वाती समजायचं ते समजली......



Thursday, January 23, 2020

Swatantrya maze

नुसतं एक स्त्री म्हणून किंवा माणूस म्हणून आपण कधीच जगत नाही  बेसिक स्वातंत्र्य संसारात पडल्यावर मागायचं नसतं. ते हवंच असेल तर मग विनापाश एकटं राहणं हाच एक उपाय आहे. आपण जगतो कुणाची तरी आई, पत्नी,  नणंद, सून, वहिनी, काकू, आत्या म्हणून.  आपण असतो सदैव कुणाची तरी सासू, आजी, विहीण,  मावशी,  मामी. या सर्व नात्यांसोबत येते अपेक्षांची भली मोठी यादी. 

एकाची अपेक्षा दुसर्याचं स्वातंत्र्य हिरावणारी असू शकते, पण त्याला इलाज नाही.  हे जो स्वीकारेल त्यानेच संसारात पडावं अन्यथा एकटा जीव सदाशिव रहावं.  तर एवढी क्लॅरिटी आली कि उरलेल्या अवकाशात आपापल्या स्वातंत्र्याची व्याख्या करता येते का ते पाहू.

नात्यांचे हे सर्व रोल्स निभावताना मुद्दाम स्वतःसाठी वेळ काढणं,  आपले छंद जोपासणं, हे माझी स्वातंत्र्याची बेसिक रुपरेखा.  स्वतःसाठी काढलेल्या वेळी इतर कोणताही रोल न करता,  तो सगळा वेळ उपभोगता येणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य. 
स्वतःच्या शरीरधर्माबद्दल जागरूक आणि आग्रही असणं हे ही खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या पाळीसंबंधित निर्णय स्वतः घेणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य.  माझ्या पाळीची तारीख माझ्या व्यतिरिक्त कोणाला माहित असावी हे ठरवण्याचा अधिकार माझा असावा. या गोष्टीशी देवाधर्माच्या संकल्पना जोडणं अथवा नाकारणं हा निर्णय मी घेणं म्हणजे स्वातंत्र्य.

मी कोणत्या प्रसंगी काय पेहराव करावा, कोणत्या समारंभाला येणं जाणं ठेवावं किंवा टाळावं याची स्पष्टीकरणं कुणाला द्यावी न लागणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य. माझं वजन,  माझे लुक्स,  माझं राहणीमान हे कुणाच्याही कल्पनाविलासाला प्रमाणे न बदलता मला रुचेल,  झेपेल आणि कम्फरटेबल वाटेल अशा पद्धतीने ठेवणं हा माझा निर्णय असेल.

कुटुंबाव्यतिरिक्त माझं स्वतःचं जग आहे.  त्यातली माझी माणसं, माझा  मित्र परिवार यांच्यामध्ये माझी भावनिक,  कधी आर्थिक गुंतवणूक असणार  आणि या बद्दल चे निर्णय मला घेता येतील ते स्वातंत्र्य. माझी विचार पक्रिया  दरवेळी समोरच्याशी जुळायलाच हवी असा माझा आग्रह नसेल आणि समोरच्याने ही तो धरू नये.  माझ्या स्वच्छतेच्या कल्पना, खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्याहून निराळ्या असतील अशा शक्यता गृहीत धरून माझ्या माणसांनी मला विनाअट स्वीकारणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य.

हे सर्व मुद्दे मलाही लागू होतात, या न्यायाने मी देखिल समोच्याचं स्वातंत्र्य जपण्यासाठी जागरूक रहावं हे ही अपेक्षित आहे.  मागच्या पिढीतील स्त्री जर स्वतःचे पारतंत्र्याचे दिवस आठवून पुढल्या पिढीतील स्त्री ला देखिल तेच पारतंत्र्य देत असेल तर त्यात तिचा ईगो सुखावेल पण माणूस म्हणून तिची वाढ खुंटेल.